पारडीतील निर्माणाधीन उड्डाणपूल ठरतोय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 08:46 PM2020-07-06T20:46:00+5:302020-07-06T20:52:14+5:30
पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पारडी येथील उड्डाणपुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. कामाची गती लोकांसाठी धोकादायक ठरली आहे. रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यात पावसाचे पाणी साचत आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर माती पसरली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना येथून आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
पारडी चौकात २४ तास जड वाहनांची वर्दळ असते. पारडी उड्डाणपुलाचे व सोबत मेट्रो रेल्वेचे कामही सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे या रस्त्याने वाहन चालकांसह पायी जाणाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. दर दिवशी अपघात होत असतात. लोकमतने येथील समस्या अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महापालिका या दोघांचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
या ठिकाणी सुरक्षा मानकाकडे अजिबात लक्ष देण्यात आलेले नाही. हनुमान मंदिरसमोरच्या रस्त्यावर उड्डाणपुलाचा उतार आहे. तेथील रस्ता सहा महिन्यापासून खोदून तसाच सोडलेला आहे. यात आतापर्यंत सहा फुटापर्यंत पाणी जमा झाले आहे. १२० मीटर रुंद असलेल्या पारडी चौकाची ओळखच बनलेली आहे. जागोजागी खड्डे, मातीचे ढिगारे, गिट्टी, अर्धवट अवस्थेतील पिल्लर अशी अवस्था आहे. गेल्या सहा वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतु आतापर्यंत केवळ ४० टक्केच काम झाले आहे. भंडारा रोड जिथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे तेथील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून येथून ये-जा करावी लागत आहे. लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यापर्यंत सर्वच बंद असल्याने नागरिकांना त्रास झाला नाही. परंतु आता सर्व व्यवहार सुरू असल्याने आणि पावसाळा वाढल्याने अडचणी जास्त वाढल्या आहेत. अपघाताचा धोका वाढला आहे.
पावसाळ्याने वाढला त्रास
पारडी येथील प्रेमचंद मेश्राम यांनी सांगितले की, निर्माणाधीन उड्डाणपुलामुळे मोठा त्रास आहे. यात पावसाळा सुरू झाल्याने हा त्रास आणखीनच वाढला आहे. या जागेतून वाहन घेऊन जाणे मोठ्या जिकिरीचे आहे. थोडेही लक्ष विचलित झाले की, अपघात झालाच म्हणून समजा. या उड्डाणपुलाने आतापर्यंत अनेकांचे जीव घेतले आहे. पारडी चौकातून जात असलेल्या नेताजीनगर येथील रामेश्वर शुक्ला यांनी सांगितले की, १२० मीटर रुंद असलेल्या या चौकाची आता ओळखच संपली आहे. रस्त्यावर माती व गिट्टी जमा झाल्याने दुचाकी वाहन चालकांसाठी येथून गाडी चालवणे धोकादायक झाले आहे.