खत, बियाणे महागले
By Admin | Updated: May 10, 2014 01:17 IST2014-05-10T01:17:35+5:302014-05-10T01:17:35+5:30
अतवृष्टी व गारपिटीमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजासमोर आता खत व बियाण्यांच्या भाववाढीचे दुसरे संकट उभे ठाकले आहे.

खत, बियाणे महागले
नागपूर : अतवृष्टी व गारपिटीमुळे अगोदरच संकटात सापडलेल्या बळीराजासमोर आता खत व बियाण्यांच्या भाववाढीचे दुसरे संकट उभे ठाकले आहे. यंदा खत व बियाण्यांच्या किमतीत प्रचंड भाववाढ झाली आहे. गतवर्षी ५ हजार ८00 रुपये प्रति क्विंटल मिळणार्या सोयाबीन बियाण्याच्या किमती ७ हजार ९५0 रुपयांवर पोहोचल्या आहेत. तसेच धानाच्या किमती ४ हजार ५00 रुपयांवरून ६ हजार रुपयांवर व तूर बियाण्याच्या किमती ९ हजार ५00 रुपयांवरून १0 हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. याशिवाय खताच्याही किमतीत वाढ झाली आहे. या संपूर्ण भाववाढीचा शेतकर्याला यंदा जबर फटका सहन करावा लागणार आहे. नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या सहा जिल्ह्यात सरासरी १४ लाख ९९ हजार ३२ हेक्टर लागवड क्षेत्र आहे. यासाठी सुमारे ४ लाख ४६ हजार १२३ क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे. त्यापैकी महाबीज महामंडळाकडून १ लाख ९२ हजार १२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगामाला साधारण एक महिन्याच्या कालावधी शिल्लक आहे. मात्र बळीराजाने पेरणीची तयारी सुरू केली आहे. खत-बियाण्यांच्या दुकानातील गर्दी वाढू लागली आहे. गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीन, तूर व धान पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अनेकांच्या सोयाबीन पिकाला शेतातच अंकूर फुटले होते. शिवाय अनेकांचे सोयाबीन काळे पडले होते. त्यामुळे योग्य सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून, बियाण्याच्या किमतीत ही भाववाढ झाली असल्याचे बोलले जात आहे.