‘हाय रिटर्न’च्या आमिषाला बळी; वर्षभरात दोन हजारांहून अधिक सायबर गुन्हे; ४५५ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:41 IST2026-03-18T12:26:02+5:302026-03-18T12:41:07+5:30
२०२५ मध्ये वर्षभरातच अशा प्रकारच्या दोन हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली असून, साडेचारशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणांमध्ये आंतरराज्यीय टोळ्यांचा मोठा सहभाग आहे.

‘हाय रिटर्न’च्या आमिषाला बळी; वर्षभरात दोन हजारांहून अधिक सायबर गुन्हे; ४५५ अटकेत
योगेश पांडे -
नागपूर : झटपट पैसे बनविण्याच्या नादात सध्या हजारो जण ‘हाय रिटर्न’च्या आमिषाला बळी पडू लागले आहेत. ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांनी राज्यात चिंताजनक स्वरूप धारण केले आहे. २०२५ मध्ये वर्षभरातच अशा प्रकारच्या दोन हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली असून, साडेचारशेहून अधिक आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणांमध्ये आंतरराज्यीय टोळ्यांचा मोठा सहभाग आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी नागरिकांकडून शोध घेण्यात येतो. त्यातूनच गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. त्यात अनेक जण उच्चशिक्षितदेखील असतात. २०२५ मध्ये एकूण २ हजार १६३ गुन्ह्यांची नोंद झाली असून, आतापर्यंत ४५५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
परदेशी सर्व्हरचा वापर करून चालवले जातेय रॅकेट
या फसवणुकीमागील प्रमुख सूत्रधार पंजाब, बिहार, दिल्ली, ओडिसा आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये बसून तर काही प्रकरणांत परदेशी सर्व्हरचा वापर, व्हर्च्युअल नंबर आणि बनावट ओळखपत्रांच्या साहाय्याने हे रॅकेट चालवले जात आहे.
राज्यातील ५० सायबर लॅब्समधून गुन्हेगारांचा शोध
महापे, नवी मुंबई येथे सायबर सुरक्षा प्रकल्पाचे मुख्यालय असून, त्या माध्यमातून राज्यभरातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलली जातात. राज्यात सद्य:स्थितीत ५० जिल्हा सायबर लॅब्स किंवा पोलिस ठाणे असून, त्यातूनच गुन्हेगारांचा माग काढला जात आहे.
मनी ट्रेलचा वापर करून रक्कम वळविली
अनेक प्रकरणांत ‘मनी म्युल्स’चा वापर केल्याचे समोर आले आहे. निरपराध व्यक्तींच्या बँक खात्यांचा वापर करून पैशांची साखळी तयार केली जाते आणि अल्पावधीतच रक्कम विविध खात्यांमध्ये वळवली जाल्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचणे कठीण होते.