निशांत वानखेडेनागपूर : दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकाराबाबत वादग्रस्त ठरलेल्या, तसेच संवेदनशील असलेल्या जिल्ह्यातील २९ केंद्रांवर यंदाही परीक्षा हाेणार आहेत. व्यवस्थेची स्थिती लक्षात घेता त्यांची मान्यता रद्द करण्याऐवजी त्या केंद्रांवर कडक नियंत्रण ठेवून परीक्षा घेतली जात आहे.
राज्य शिक्षण मंडळाद्वारे १० फेब्रुवारीपासून बारावीची आणि २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा घेतली जात असून परीक्षांची तयारी जाेरात सुरू आहे. जिल्ह्यात यंदा बारावीच्या १७२ केंद्रांवर आणि दहावीच्या २२२ केंद्रांवर परीक्षा हाेणार आहे. यासाठी विभागीय शिक्षण मंडळ व शिक्षण विभागाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. नुकतीच २९ जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये शिक्षण विभागासह पाेलीस विभाग व महसूल विभागाला व्यवस्थेबाबत निर्देश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान परीक्षेदरम्यान काॅपीसारखे गैरप्रकार राेखण्यासाठी शिक्षण मंडळाकडून कठाेर पाऊले उचलली जात आहेत. याअंतर्गत नेहमी गैरप्रकारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या संवेदनशील केंद्रांची तपासणी करून त्यांचा अहवाल पाठविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले हाेते. त्यानुसार बाेर्डाकडून जिल्ह्यातील अशा २९ केंद्रांची माहिती देण्यात आली आहे. या केंद्रांवर गेल्यावर्षी गैरप्रकार आढळून आले हाेते. यात शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील २६ संवेदनशील केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण मंडळाने दिले हाेते. मात्र मान्यता रद्द न करता त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
या कारणाने पुन्हा संधी
या केंद्रांवर माेठ्या संख्येने विद्यार्थी आहेत. शिवाय नियमानुसार ५ किमीच्या परीघात आसपास याेग्य केंद्र उपलब्ध नसल्याने त्याच केंद्रांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आली आहे. मात्र या केंद्रांची माहिती महसूल व पाेलीस विभागाला देण्यात आली असून कडक नियंत्रण ठेवून या केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विभागाचे ६ भरारी पथक, ड्राेननेही लक्ष
दरम्यान परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार राेखण्यासाठी शिक्षण विभागाकडून कडक व्यवस्था करण्यात येत आहे. केवळ विभागाचीच ६ भरारी पथक तैनात केलेली आहे. यात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांची पथके असतील.
- याशिवाय जिल्हाधिकारी, पाेलीस आणि महसूल विभागाचेही वेगळे पथक सज्ज राहणार आहेत. प्राचार्य, तसेच डाएट अधिकाऱ्यांचीही पथके कार्यरत राहणार आहेत. तालुका स्तरावरही दक्षता समिती कार्यरत असणार आहे.
- प्रत्येक केंद्र सीसीटीव्हीच्या निगराणीखाली राहणार आहे.
- संवेदनशील केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात येणार आहेत. यासह पाेलीस विभागाकडून ड्राेन कॅमेराद्वारे निगराणी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Web Summary : Despite past issues, 29 sensitive exam centers will operate under strict surveillance. Authorities will implement measures like CCTV and drone monitoring to prevent cheating during the upcoming exams.
Web Summary : पिछली समस्याओं के बावजूद, 29 संवेदनशील परीक्षा केंद्र कड़ी निगरानी में संचालित होंगे। आगामी परीक्षाओं के दौरान नकल रोकने के लिए अधिकारी सीसीटीवी और ड्रोन निगरानी जैसे उपाय लागू करेंगे।