परीक्षा खिशाचीही!
By Admin | Updated: May 12, 2014 01:03 IST2014-05-12T01:03:59+5:302014-05-12T01:03:59+5:30
पोस्ट विभागाच्या लेखी परीक्षेसाठी संपूर्ण विदर्भातून आलेल्या परीक्षार्थ्यांमुळे रविवारी नागपूर रेल्वेस्थानक गर्दीने गजबजून गेले होते. दुपारी ३ पासून उमेदवारांनी रेल्वेस्थानकावर एकच

परीक्षा खिशाचीही!
नागपूर : पोस्ट विभागाच्या लेखी परीक्षेसाठी संपूर्ण विदर्भातून आलेल्या परीक्षार्थ्यांमुळे रविवारी नागपूर रेल्वेस्थानक गर्दीने गजबजून गेले होते. दुपारी ३ पासून उमेदवारांनी रेल्वेस्थानकावर एकच गर्दी केल्यामुळे प्लॅटफार्म आणि पश्चिमेकडील भागात पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र होते. गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमारांनी अनेक बेरोजगारांच्या पाकीट आणि मोबाईलवर हात साफ केल्याच्या घटनाही घडल्या. रविवारी पोस्ट विभागाच्या लेखी परीक्षेचे आयोजन नागपूर शहरातील विविध केंद्रांवर करण्यात आले होते. नागपूर हे एकमेव परीक्षेचे केंद्र असल्यामुळे संपूर्ण विदर्भातून उमेदवारांनी परीक्षेसाठी हजेरी लावली होती. परीक्षा आटोपल्यानंतर दुपारी ३ नंतर उमेदवारांचे लोंढेच्या लोंढे रेल्वेस्थानकाच्या दिशेने कूच करताना दिसले. दुपारी ४ वाजेपर्यंत रेल्वेस्थानकाच्या सर्वच प्लॅटफार्मवर आणि पश्चिमेकडील भागात असंख्य उमेदवार गोळा झाल्यामुळे पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. परीक्षेसाठी आलेले तरुण-तरुणी जागा मिळेल तेथे घोळक्याने उभे असल्याचे चित्र दिसले. या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. या गर्दीचा फायदा घेऊन रेल्वेस्थानकावर पाकिटमारही सज्ज झाले. त्यांनी परीक्षेसाठी आलेल्या परीक्षार्थ्यांच्या पाकीट आणि मोबाईलवर हात साफ केला. आदित्य चारुदत्त भगत (१९) रा. सक्करदरा हा तरुण परीक्षेसाठी आलेल्या आपल्या मित्राला सोडण्यासाठी दुपारी ४ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आला होता. त्याने प्लॅटफार्म क्रमांक ४ वर मित्राला सोडले. त्यानंतर तो परत रेल्वेस्थानकाबाहेर येत असताना त्याला आपले पाकीट कुणीतरी मारल्याचे लक्षात आले. त्याच्या पाकिटात वाहन चालविण्याचा परवाना, एटीएम, स्मार्ट कार्ड आणि रोख रक्कम होती. रवि अरुणराव सोळंकी (२१) रा. अंजनगाव अकोट रोड, अकोला हा तरुणही परीक्षेसाठी आला होता. पहाटे ४ वाजता तो नागपूर रेल्वेस्थानकावर असताना त्याचे पाकीट, मोबाईल आणि रेल्वे तिकीटही अज्ञात आरोपीने पळविले. सायंकाळपर्यंत आपले पाकीट, मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी घेऊन अनेक उमेदवार लोहमार्ग पोलीस ठाण्यात आले होते. (प्रतिनिधी) गर्दी परीक्षार्थींची : पोस्ट विभागातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी विदर्भासह शेजारील राज्यातील लाखो उमेदवारांनी रविवारी नागपुरात परीक्षा दिली. त्यावेळी रेल्वेस्थानक असे गर्दीने फुलले होते.