लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : काचूरवाही (ता. रामटेक) येथील काेराेना संक्रमण आणि मृत्युदर वाढत आहे. या गावात १५ दिवसांमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी काही उपाययाेजना करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिक कुणाचेही ऐकायला तयार नसल्याने गावात पाेलीस बंदाेबस्त वाढवावा, अशी मागणी सरपंच शैलेश राऊत यांनी केली आहे.
काचूरवाही हे रामटेक तालुक्यातील माेठ्या गावांपैकी एक गाव असून, येथे बाजारपेठ व आठवडी बाजार भरत असल्याने काचूरवाहीशी परिसरातील काही गावांमधील नागरिकांचा सतत संपर्क येताे. रामटेक तालुक्यासह गावात काेराेना संक्रमण वाढायला सुरुवात झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावात पुढील आदेशापर्यत आठवडी बाजार भरणार नाही. शिवाय नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, मास्कचा नियमित वापर करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचनाही दवंडीद्वारे वेळाेवेळी दिल्या. मात्र, येथील आठवडी बाजार भरणे, नागरिकांचे फिरणे, मास्क न वापरणे, गर्दी करणे यासह अन्य बेजबाबदार बाबी सुरू राहिल्या.
परिणामी, काचूरवाही येथे काेराेनाचे संक्रमण झपाट्याने वाढायला सुरुवात झाली. त्यातच गेल्या पंधरवड्यात येथील आठ जणांचा मृत्यूही झाला. वारंवार सूचना देऊनही नागरिकांनी मागील आठवड्यात रविवारऐवजी साेमवारी (दि. १२) आठवडी बाजार भरवला हाेता. याबाबत आपण पाेलीस व तहसील प्रशासनाला माहिती दिली आहे. गावात खुलेआम पानटपऱ्या सुरू असून, खर्रा विक्री केली जाते. या पानटपऱ्यांवर नागरिकांची गर्दी असते. मृत्युदर वाढत असल्याने तसेच नागरिक ऐकत नसल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात रूट मार्च करून पाेलीस बंदाेबस्त लावण्यात यावा, अशी मागणी सरपंच शैलेश राऊत यांनी केली आहे.