नागपुरात पोलिसांच्या ‘ऑपरेशन यु टर्न’चा इफेक्ट, आठ महिन्यांत अपघाती मृत्यूंमध्ये ३० टक्क्यांनी घट
By योगेश पांडे | Updated: September 1, 2025 22:46 IST2025-09-01T22:45:44+5:302025-09-01T22:46:07+5:30
अल्पवयीनांना वाहने देणाऱ्या ५० हून अधिक पालकांवर पोलिसांची कारवाई

नागपुरात पोलिसांच्या ‘ऑपरेशन यु टर्न’चा इफेक्ट, आठ महिन्यांत अपघाती मृत्यूंमध्ये ३० टक्क्यांनी घट
- योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठ महिन्यांत शहरातील प्राणघातक अपघात व अपघाती मृत्यूंमध्ये चांगलीच घट दिसून येत आहे. २०२४ च्या तुलनेत यंदा पहिल्या आठ महिन्यांत अपघाती मृत्यूंमध्ये ३० टक्क्यांची घट झाली आहे. पोलिसांकडून ‘ऑपरेशन यु टर्न’ सुरू असून त्यामुळेच ही घट झाली असल्याचा दावा वाहतूक पोलीस विभागातर्फे करण्यात आला आहे.
२०२४ मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत २३८ प्राणांतिक अपघात झाले होते व त्यात २५३ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४३६ जण जखमी झाले होते. या वर्षी याच कालावधीत या अपघातांत चांगलीच घट झाली. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत १६५ प्राणांतिक अपघात झाले व त्यात १९५ जणांचा मृत्यू झाला. तर ४१७ लोक जखमी झाले. एकूण अपघातांची संख्या ७३ ने घटली असून मृत्यूंच्या संख्यादेखील ५८ ने घट झाली आहे.
कॉटन मार्केट वगळता इतर झोनमध्ये घट
झोननिहाय आकडेवारीची तुलना केली असता कॉटन मार्केट झोनमध्ये अपघाती मृत्यूंची संख्या वाढली आहे. तेथे १२० टक्क्यांनी मृत्यूंमध्ये वाढ झाली. मात्र दुसरीकडे सोनेगाव (६१ टक्के), सिताबर्डी (३६ टक्के), लकडगंज (३८ टक्के), अजनी (४० टक्के), सक्करदरा (३९ टक्के) व कामठी (२९ टक्के) या झोनमध्ये घट झाली आहे.
झोननिहाय अपघात व मृत्यू (जानेवारी ते ऑगस्ट)
झोन : मृत्यू (२०२४) : मृत्यू (२०२५)
एमआयडीसी : ५६ : ५४
सोेनेगाव : १६ : ५
सदर : २१ : १८
सिताबर्डी : १४ : ९
कॉटन मार्केट : ५ : ११
लकडगंज : ८ : ५
अजनी : ४० : २४
सक्करदरा : २३ : १४
इंदोरा : ३२ : २८
कामठी : ३८ : २७
अडीच हजारांहून अधिक तळीरामांवर कारवाई
ऑपरेशन यु टर्न अंतर्गत १० जुलैपासून मद्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्या अडीच हजारांहून अधिक तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. ३३ ठिकाणी नाकाबंदी करत दररोज हजाराहून अधिक लोकांची तपासणी सुरू आहे.
५० हून अधिक पालकांवर गुन्हा दाखल
शहरात अनेक अल्पवयीन मुलांकडूून वाहने चालविण्यात येतात. अशी मुले आढळल्यास त्यांच्या पालकांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १९९ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आतापर्यंत ५० हून अधिक अल्पवयीन मुलांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.