ग्राहकांची दिवाळी
By Admin | Updated: April 1, 2017 02:53 IST2017-04-01T02:53:44+5:302017-04-01T02:53:44+5:30
सुप्रीम कोर्टाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदीला व विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने

ग्राहकांची दिवाळी
३ हजार दुचाकी तर १०० कार्सची विक्री
नागपूर : सुप्रीम कोर्टाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदीला व विक्रीला १ एप्रिलपासून बंदी घालण्यात आल्याने व वाहन विक्रेत्यांनी वाहनांवर मोठी सूट दिल्याने एकट्या उपराजधानीत तीन हजार दुचाकी तर १०० कार्सची हातोहात विक्री झाली. यातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) २ कोटी १७ लाखांचा महसूल प्राप्त झाला. विशेष म्हणजे, बहुसंख्य वाहन विक्रेत्यांकडे असलेल्या वाहनांचा ‘स्टॉक’ शुक्रवारी दुपारी १२ वाजताच संपला. परिणामी, अनेक ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागले. मात्र, ज्यांना दुचाकीवर ५ ते १५ हजार तर चारचाकी वाहनांवर ७० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळाली त्यांनी ‘दिवाळी’सारखा आनंद साजरा केला.
‘आऊट आॅफ स्टॉक’ चे लागले फलक
‘बीएस-३’ वाहनांच्या विक्रीची ३१ मार्च ही शेवटची तारीख असल्याने दुचाकी वाहनांवर साधारण ५ ते १५ हजार तर चारचाकी वाहनांवर साधारण ७० हजार रुपयांपर्यंत सूट देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासूनच मोठ्या संख्येत ग्राहक मोठ्या आशेने विविध शोरुममध्ये पोहचले. परंतु दुपारी १२ वाजत नाही तोच ‘आऊट आॅफ स्टॉक’चे फलक लागणे सुरू झाले. यामुळे ग्राहकांमध्ये निराशा पसरली. काहींनी अधिकाऱ्यांपासून ते नेत्यापर्यंतची मदत घेऊन ‘डिस्काऊंट’मध्ये वाहन मिळते का याचेही प्रयत्न केल्याचे समजते.
‘बीएस-३’ या वायूप्रदूषणविषयक मानकाची दुचाकी, तीनचाकी व चार चाकी वाहनांच्या उत्पादनावर व विक्रीवर बंदी घातली आहे. शिवाय १ एप्रिल २०१७ पासून अशा वाहनांची नोंदणीही होणार नाही. त्या ऐवजी ‘बीएस-४’ या वायूप्रदूषण मानकाची पूर्तता केलेल्या वाहनांचे उत्पादन व विक्री होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने स्थानिक वाहन (आॅटोमोबाईल) क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ‘बीएस-३’ वाहनांना ग्राहक मिळण्यासाठी शहरातील बहुसंख्य वाहन विक्रेत्यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर ‘बंपर डिस्काऊंट’ उपलब्ध करून दिले होते. यामुळे गुरुवारपासून बहुसंख्य वाहन विक्रेत्यांचे शोरुम ग्राहकांनी फुल्ल होते. मात्र शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेकांकडील वाहनांचा ‘स्टॉक’ संपला. दोन दिवसात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये तीन हजार दुचाकी तर १०० कार्सची विक्रमी विक्री झाली.