महिलांविरुद्धचे गुन्हे वाढताहेत - पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली चिंता :
By Admin | Updated: June 11, 2015 02:42 IST2015-06-11T02:42:05+5:302015-06-11T02:42:05+5:30
राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपुरात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे.

महिलांविरुद्धचे गुन्हे वाढताहेत - पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली चिंता :
ठाणेदारांना दिले कडक कारवाईचे आदेश
नागपूर : राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपुरात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. परंतु आता कुठल्याही गुन्हेगाराला सोडू नका, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी शहरातील सर्व ठाणेदारांना दिले. बुधवारी सकाळी सिव्हिल लाईन्स येथील पोलीस जिमखाना येथे शहरातील गुन्ह्यांसंदर्भात आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. बैठकीत सहपोलीस आयुक्त राजवर्धन, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, दीपक पांडेय, उपायुक्त क्राईम दीपाली मासीरकर, निर्मलादेवी, संजय लाटकर, अभिनाश कुमार, सहायक पोलीस आयुक्त पंडित भगत व विशेष सेलसहित वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.
बैठकीनंतर पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, वर्ष २०१४ ते वर्ष २०१५ च्या जानेवारी ते मेपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीचा आढावा घेण्यात आला. यात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महिलांशी संबंधित गुन्हे थांबविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच पोलीस ठाण्यात प्रत्येक नागरिकांशी आदरयुक्त व्यवहार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय वाढते अपघात लक्षात घेऊन वाहतूक विभाग विशेष अभियान चालविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)