वीज बिल भरण्यातच अर्धा पगार होतोय खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:16 IST2019-07-08T12:16:04+5:302019-07-08T12:16:51+5:30

विजेच्या भरमसाट बिलामुळे नागरिक आधीच त्रासले आहेत. यातच ३ ते ५ हजार रुपयापर्यंत वीज बिल येत असल्याने नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे.

The cost of half the salary for paying electricity bills | वीज बिल भरण्यातच अर्धा पगार होतोय खर्च

वीज बिल भरण्यातच अर्धा पगार होतोय खर्च

ठळक मुद्दे३ ते ५ हजारापर्यंत बिल आल्याने सामान्य नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विजेच्या भरमसाट बिलामुळे नागरिक आधीच त्रासले आहेत. यातच ३ ते ५ हजार रुपयापर्यंत वीज बिल येत असल्याने नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. उत्तर नागपुरातील इंदिरानगरसारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मजुरांचा अर्धा पगार तर विजेचे बिल भरण्यातच खर्च होत आहे, तेव्हा त्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उत्तर नागपुरातील प्रभाग ५ मधील इंदिरा माता नगरात बहुतांश मजुरी करणारे लोक राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. ही मंडळी विजेचे बिल पाहून चिंतेत पडले आहे. त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक बिल आल्याने ते एसएनडीएलच्या कार्यालयात गेले. तेव्हा त्यांना बिलमध्ये सूट देण्याऐवजी त्यांच्या वीज मीटरची तपासणी करण्यासाठी २७० रुपये भरण्याचा सल्ला देण्यात आला. सेमिनरी हिल्स येथील एसएनडीएल कार्यालयातही याप्रकारच्या तक्रारी येत आहेत. नागरिकांचे म्हणणे आहे की, विजेचे बिल मनमानी पद्धतीने पाठविले जात आहे. इंदिरा माता नगर येथील खेमाबाई यादव, राजवंती यादव यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरी इलेक्ट्रिक मीटर लावण्यात आले तेव्हापासून आतापर्यंत इतके बिल कधीच आले नाही. परंतु आता हजारो रुपये बिल येत आहेत. मातीगोटे उचलण्याचे काम करून आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवतो. तेव्हा इतके बिल कसे भरायचे. येथील लोक सकाळी लवकरच कामासाठी बाहेर पडतात. रात्री येतात.
अशावेळी २०० ते ३०० रुपये विजेचे बिल आले तरी पुष्कळ आहे. तेव्हा इतके विजेचे बिल कोणत्या हिशेबाने पाठविण्यात आले आहे, याची चौकशी व्हावी. गडबड करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.
स्थानिक रहिवासी झडिराम साहू व मूलचंद साहू यांनी सांगितले की, ंमहिन्याला कसेबसे ८ ते ९ हजार रुपये कमावणाºयांना ३ ते ५ हजार रुपये विजचे बिल पाठविण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब पोसायचे कसे? यावेळी आलेले विजेचे बिल तब्बल चौपट कसे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
सध्या जास्त बिल येत असल्यास नागरिकांना मीटर तपासण्याचा सल्ला देणाºया एसएनडीएलला बिलामध्ये करण्यात येत असलेल्या नोंदीचीही चौकशी करण्याची गरज आहे. चार वर्षांपूर्वी तुळशीबाग येथील वीज विभागाच्या कार्यालयासमोर वाढलेले बिल आल्यावर नागरिकांनी विजेच्या बिलांची होळी केली होती. त्यावेळी आंदोलन करणारे आज सत्तेत आहेत. तरीही विजेचे बिल त्या तुलनेत अधिक येत आहे. इतकेच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांनाही भरमसाट बिल पाठवले जात आहे.

Web Title: The cost of half the salary for paying electricity bills

टॅग्स :electricityवीज