CoronaVirus in Nagpur : भाज्या खरेदीसाठी ही गर्दी आवश्यक आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 08:22 PM2020-03-28T20:22:34+5:302020-03-28T20:30:40+5:30

लॉकडाऊन आणि कलम १४४ लागू असतानाही शनिवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी कुटुंबीयांसह कॉटन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी केली.

CoronaVirus in Nagpur: Is it necessary this crowd to buy vegetables? | CoronaVirus in Nagpur : भाज्या खरेदीसाठी ही गर्दी आवश्यक आहे का?

CoronaVirus in Nagpur : भाज्या खरेदीसाठी ही गर्दी आवश्यक आहे का?

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये लोकांची प्रचंड गर्दी : जत्रेचे स्वरूप, कलम १४४ चे सर्रास उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन आणि कलम १४४ लागू असतानाही शनिवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी लोकांनी कुटुंबीयांसह कॉटन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी केली. घरात भाज्यांना पर्याय उपलब्ध असतानाही लोकांनी एवढी खरेदी का केली आणि कलम १४४ चे उल्लंघन करीत भाज्या खरेदीसाठी गर्दी करणे आवश्यक होते काय, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसचे गांभीर्य लोकांना अजूनही कळले नाही, हे यावरून दिसून येते.
कॉटन मार्केट परिसरातील लोकांनी सांगितले की, कळमना मार्केट ३० मार्चपर्यंत बंद असल्याने लोकांनी शनिवारी सकाळी कॉटन मार्केटमध्ये गर्दी केली. सकाळी ६ पासूनच लोकांनी गर्दी होती. ५०० पेक्षा जास्त वाहने विजय टॉकीज, कॉटन मार्केट परिसर आणि गीता मंदिरपर्यंत पार्क केली होती. या बाजाराला जत्रेचे स्वरूप आले होते. लोकांनी थैल्या भरून भाजीपाला घरी नेला. शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दररोज सुरू राहणार असल्याची घोषणा केल्यानंतरही एकाच दिवशी जास्त प्रमाणात भाज्यांची खरेदी करण्याचे औचित्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकांच्या बेजबाबदारपणाचा त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. लोकांमध्ये परोपकाराची भावना असावी, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.
कॉटन मार्केट अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, भाज्या खरेदीसाठी लोकांची एवढी गर्दी आजपर्यंत बाजारात पाहिली नाही. लोकांनी सकाळपासून खरेदी सुरू केली होती. कुटुंब लहान असतानाही लोकांनी अनावश्यक दुप्पट वा तीनपट खरेदी केली. घरी एक किलो टोमॅटोची गरज असताना लोकांनी पाच किलो खरेदी केले. कांदे आणि बटाट्याची पाच-पाच किलो खरेदी केली. भाज्या मुबलक प्रमाणात किरकोळ बाजारात उपलब्ध असताना लोकांकडून करण्यात येणारी खरेदी ही आश्चर्याची बाब आहे. अशा संकटसमयी लोकांनी घराबाहेर निघू नये. विक्रेत्याने दोन रुपये जास्त मागितले तर त्याला देऊन घराजवळील विक्रेत्याकडून भाज्या खरेदी करण्यात धन्यता मानावी आणि होलसेल बाजारात लोकांनी गर्दी करू नये, असे महाजन म्हणाले.
शनिवारी बाजारात स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून तीनपट आवक झाली. त्यानंतरही सकाळी ९.३० पर्यंत ९० टक्के भाज्या संपल्या होत्या. यावरून लोकांनी किती प्रमाणात भाज्यांची खरेदी केली, याचा अंदाज येऊ शकतो. लोकांची गर्दी पाहून पोलीस, मनपाचे कर्मचारी, बाजारातील व्यापारी आणि अडतियांनी लोकांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. रविवारपासून दुकानासमोर दोर लावून भाज्यांची विक्री करण्याचे निर्देश मनपा कर्मचाऱ्यांनी दिले आहेत. ग्राहकांना टप्प्याटप्प्याने बाजारात सोडावे, असेही आवाहन कर्मचाऱ्यांनी केले आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष शेख हुसेन म्हणाले, भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असून आवकही वाढली आहे. अशा स्थितीत ग्राहकांनी आपली जबाबदारी समजून खरेदीसाठी गर्दी करू नये. गंभीर परिस्थितीत सर्वांना समजून घेण्याची गरज आहे.
पोलीस गर्दी हटविण्याऐवजी चालान कापण्यात गर्क
कॉटन मार्केटमध्ये लोकांची गर्दी हटविण्याऐवजी पोलिसांनी गाड्यांचे चालान कापण्यातच धन्यता मानली. लोकांना हटविण्याची मागणी पोलिसांना वारंवार केली, पण त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. या परिसरातील नागरिक विशाल नागुलवार म्हणाले, दुचाकी घेऊन भाजी आणण्यासाठी कॉटन मार्केटमध्ये गेलो होतो. परत येताना चौकात जीवन निनावे या शिपायाने १४०० रुपयांचे चालान कापले. अशीच घटना अनेकांसोबत घडली. सर्वांनीच पोलीस लोकांना हाकलून लावण्याऐवजी शासनाचा महसूल वाढविण्यात गुंतल्याचा आरोप केला.

मनपाने भाजीपाला गाडी वस्तीत फिरवावी
भाजीविक्रेते भाजी खरेदी करण्यासाठी सकाळी कॉटन मार्केटमध्ये गर्दी करतात. भाजी खरेदी करून ते आपापल्या भागातील चौक, रस्ते, कॉलनीत दुकान लावतात. भाजीपाल्याचे दुकान सुरू झाल्याचे कळताच लोक घरून पिशवी घेऊन निघतात व गर्दी करतात. आता ही गर्दी रोखायची असेल तर ही भाजीपाल्याची दुकाने बंद करण्याची गरज आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेने गाडीची व्यवस्था असलेल्यांनाच विक्रीची परवानगी द्यावी. भाजीपाला भरलेल्या या गाड्या वस्ती, कॉलनीमध्ये फिरवाव्या. नागिरकांना माफक दरात त्यांच्या दारात भाजीपाला उपलब्ध करून द्यावा. भाजीपाला अवाजवी दरात विकला जाऊ नये म्हणून तक्रार करण्यासाठी महापालिकेने गाडीवरच एक मोबाईल नंबरही लावावा. आयुक्त मुंढे यांनी या सूचनेची दखल घेतली तर नागरिकांना घरपोच भाजीपाला मिळेल व गर्दीही होणार नाही.

Web Title: CoronaVirus in Nagpur: Is it necessary this crowd to buy vegetables?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.