दोन लाख बांग्लादेशींना भारतीय नागरिक बनविण्याचे षडयंत्र
By आनंद डेकाटे | Updated: January 24, 2025 14:58 IST2025-01-24T14:55:55+5:302025-01-24T14:58:59+5:30
किरीट सोमय्या यांचा आरोप : नागपुरातील बांग्लादेशींना शोधून कारवाई करण्याची मागणी

Conspiracy to make two lakh Bangladeshis Indian citizens
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०२४ मध्ये दोन लाख बांग्लादेशी (रोहिंग्या) स्थलांतरितांना महाराष्ट्रात भारतीय नागरिक बनवण्याचे मोठे षडयंत्र रचल्या गेले. यासाठी बेकायदेशीर पद्धतीने जन्म दाखले तयार केले गेले. १ लाख ७ हजार लोकांना जन्मदाखले वितिरत झाले. तर ९० हजार लोकांच्या जन्मदाखल्यांची प्रक्रिया सुरू आहे, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ही सर्व जन्म दाखले उशीरा सादर झाली असून यासर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
किरीट सोमय्या यांनी सांगितले की, रोहिंग्या बांगलादेशी प्रमाणपत्र घोटाळ्याअंतर्गत विविध जिल्ह्यात जन्मदाखल्यासाठी उशीरा अर्ज करणाऱ्यांची माहिती मिळवली आहे. यात धक्कादायक माहिती हाती आली. अनेक जणांनी तर ७० वर्षानंतर अर्ज केला आहे.
वोट जिहाद अंतर्गत बांग्लादेशी रोहिग्यांना भारतीय नागरिक बनवण्याचे षडयंत्र रचल्या गेले. काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, एमआयएम, दहशतवादी संघटना आणि बॉर्डरवरील दोन एजेंट यांनी हे षडयंत्र रचले आहे. हा मोठा गेम प्लान आहे. सरकारने याची दखल घेत एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीने आपले काम सुरू केले आहे. राज्यभरात मोठ्या प्रमणावर जन्मदाखले वितिरत करण्यात आले आहेत. मालेगावात दोन अधिकारी निलंबित झाले आहे. इतर जिल्ह्यातील आणखी काही अधिकारी निलंबित होतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
याअंतर्गत किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. नागपूर जिल्ह्यातही ४ हजारावर जन्मदाखले हे उशीरा सादर झाल्याचे सांगण्यात येते. याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सर्वांचा शोध घेऊन बांग्लादेशात परत पाठवा
आतापर्यंत ज्या १ लाख ७ हजार बांग्लादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले वितिरत केले, त्यांचा आणि ज्या ९० हजार लोकांच्या प्रमाणपत्रावर कारवाई सुरु आहे, त्यांचा शाेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना बांग्लादेशात परत पाठवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
मालेगाव बँक घोटाळ्यातला पैसा
सोमय्या यांनी सांगितले की, ३७ तालुक्यात जाऊन आलो किंवा माहिती मिळवली, त्यात ९९ टक्के रोहिंग्या बांगलादेशी मुस्लिम आहेत. त्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. हे कटकारस्थान मालेगाव मध्ये सुरू झाले. आणि यासाठी मालेगाव मध्ये जो बँक घोटाळा झाला त्यातून पैसे पुरवण्यात आले.