आनंद डेकाटे, नागपूर: काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता रिकामे आहेत. राहुल गांधी यांना यात्रेची सवय आहे. काँग्रेस शेतकरी आत्मसन्मान यात्रा काढत आहे. मात्र कॉंग्रेसच्या यात्रा निरर्थक असतात. त्याला समर्थन मिळत नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते रविवारी प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, दिवसाला बारा तास वीज आम्हाला शेकऱ्यांना पुढच्या तीन वर्षात द्यायची आहे. शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते बांधत आहोत. पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देत आहे.असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. आता कॉंग्रेसकडे सांगण्यासारखे काही शिल्लक नाही. ६५ वर्षात त्यांनी काय केलं सांगता येत नाही. जनतेमध्ये संभ्रम तयार करून राजकारणाची पोळी शेकण्यासाठी यात्रा काढल्या जातात,असे बावनकुळे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये दिले ते सर्व केंद्र सरकार पूर्ण करीत आहे.काँग्रेसने त्यांच्या ६५ वर्षाच्या काळात जे करू शकले नाही ते सर्व महाराष्ट्रातील महायुतीचे डबल इंजिन सरकार मार्गी लावत आहे.
सरकार बदलले, मंत्री बदलले तरी त्यांचे ओसडी, स्वीय सहाय्यक बदलत नाही. तेव्हा त्या सरकारच्या अजेंडावर काम करणारा अधिकारी आले पाहिजे आणि अधिकारी जे अनेक वर्ष एकाच ठिकाणी आहे त्यांनी फिल्डवरही काम केले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवर नाराजी नाहीभारतीय जनता पक्षाने निवडलेल्या जिल्हाध्यक्षांबाबत कुठलीही नाराजी नाही आहे. सर्व जिल्हाध्यक्षांची निवड कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करण्यात आल्या आहेत. एका जागेसाठी चार जण इच्छुक असतात. त्यामुळे नाराजी वाटते.पण तसे नाही.ज्यांची नाराजी आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या मंडळामध्ये सामावून घेणार आहे, असे बावनकुळे म्हणाले. केंद्र सरकारने नक्षलवाद मोडून काढण्याचा संकल्प केला आहे गृहमंत्री एक कणखर आहेत अशा कुठल्याही धमक्यांना सरकार भीक घालणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.