"त्या मनोरुग्णाची २५ एकर शेती"; परभणी हिंसाचार प्रकरणात नाना पटोलेंचे खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:12 IST2024-12-16T12:58:15+5:302024-12-16T13:12:55+5:30
परभणीतल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत.

"त्या मनोरुग्णाची २५ एकर शेती"; परभणी हिंसाचार प्रकरणात नाना पटोलेंचे खळबळजनक आरोप
Nana Patole on Parbhani Violence :परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची माथेफिरूने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या बंदला हिंसक वळण लागलं होतं. यावेळी आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक करत जाळपोळ केली होती. या घटनेनंतर एका माथेफिरुने हे कृत्य केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आरोपीला अटक झाल्यानंतर हिंसा करणे योग्य नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत.
परभणीत एका व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाची तोडफोड केली होती. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक आणि जाळपोळ केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता परभणीतल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे.
"ज्या पवार नावाच्या मनोरुग्णाने ते कृत्य केल्याचे सांगितले जात आहे तो २५ एकराचा शेतकरी आहे. बांगलादेशात हिंदूविरोधात होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात जो मोर्चा निघाला होता त्यामध्ये पवार नावाचा हा मनोरुग्ण होता. आंदोलनानंतर तो व्यक्ती तिथे गेला. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मोर्चात किती मनोरुग्ण असतील याचा अंदाज येईल. बांगलादेशच्या हिंदूंवर अन्याय होतो म्हणून इथे मोर्चा काढला जातो. मग बीडमध्ये हत्या झालेला देशमुख हा देखील हिंदू होता. मग हिंदूंची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मानसिकतेला आपण काय म्हणणार आहात," असा सवाल नाना पटोले यांनी केला.
"बांगलादेश विरोधातील मोर्चात पवार होता. त्यानंतर तो बाबासाहेबांच्या प्रतिमेच्या ठिकाणी गेला. तिथे त्याने संविधानाची विटंबना केली. आता कुठलेही लोक सुरक्षित नाहीत. परभणी, बीड सारख्या घटना महाराष्ट्राच्या जनतेने उभा केलेला ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन लक्ष वळवण्यासाठी केल्या जात आहेत. कोम्बिंग ऑपरेशन करुन लक्ष वळवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे का असे मुद्दे निर्माण झाले आहेत," असं नाना पटोले म्हणाले.