कमलेश वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय काँग्रेसने देशभरातील अर्ध्याहून जास्त राज्यांतील शहर व जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर आता महाराष्ट्रातही संघटन सृजन अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील सर्वच शहर व जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी अ. भा. काँग्रेसने ३७निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. संबंधित निरीक्षक काँग्रेसचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांपासून ते काँग्रेस विचारांच्या लोकांची मते घेऊन शहर व जिल्हाध्यक्ष पदासाठी पॅनल तयार करून अ.भा. काँग्रेसकडे पाठविणार आहे.
अ. भा. काँग्रेसने छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हिमाचल, हरयाणा, जम्मू काशीमर, मणीपूर, मिझोराम, नागालॅण्ड, तेलंगना, आध्र प्रदेश, तामीळनाडू, ओरिसा, झारखंडा, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये संघटन सृजन अभियान राबवीत अनेक शहर व जिल्ह्यातील अध्यक्षांच्या नियुक्तीत धक्कातंत्र वापरले आहे. बऱ्याच ठिकाणी नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तिपेक्षा काँग्रेस विचारांच्या लोकांना अपेक्षित असलेल्या कार्यकर्त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय राज्यातील बऱ्याच नेत्यांनी दुसऱ्या राज्यात निरीक्षक म्हणून काम केले आहे. याची जाणीव असल्यामुळे राज्यातील नेत्यांनीही हे अभियान गांभीर्याने घेतले आहे.
निरीक्षक नेमके काय करतील
- अ. भा. काँग्रेसने नेमलेले निरीक्षक संबंधित जिल्ह्यातील काँग्रेस नेते, विधानसभा, ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, एनजीओ, सिव्हिल सोसायटी, व्यावयासिक संघटना, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस हितेशी यांच्या भेटी घेऊन त्यांची मते जाणून घेतील.
- निरीक्षकांना किमान सात दिवस मुक्कामी असणे बंधनकारक आहे. दररोजच्या भेटीचा अहवाल अ.भा. काँग्रेककडे सादर करावा लागेल.
- या चर्चेतून येणाऱ्या इनपूटच्या आधारे शहर व जिल्हाध्यक्ष पदासाठी जास्तीत जास्त सहाजणांचे पॅनल तयार करून अ. भा. काँग्रेसकडे पाठविले जाईल.
- निरीक्षक नावे पाठविताना प्राधान्यक्रम देऊ शकतात. नेत्यांचा कल, लिंग, जात, विभागीय समतोल, सामाजिक समीकरण आदी बाबी विचारात घेऊन हा क्रम ठरविला जाईल.
- निरीक्षकाने पाठविलेले पॅनल व अहवालाच्या आधारावर अ. भा. काँग्रेसकडून शहर व जिल्हाध्यक्षांची घोषणा केली जाईल.
इच्छुकांना करावे लागतील अर्ज
राज्यासाठी नेमलेल्या ३७ निरीक्षकांना लवकरच जिल्हानिहाय जबाबदारी सोपविली जाईल. अभियानासाठी पुढील १५ दिवसात वेळापत्रक जाहीर होईल. या कालावधीत शहर व जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांना निरीक्षकांकडे अर्ज सादर करावा लागेल. आलेल्या अर्जातील सहाजणांचे पॅनल निरीक्षक तयार करेल. एखाद्याने अर्ज भरला नाही, पण काँग्रेसजनांचा कल त्याच्या बाजूने असेल तर त्याचेही नाव निरीक्षक पॅनलमध्ये पाठवू शकतात.
निरीक्षकांवरही दिल्लीतून 'वॉच'
जिल्हास्तरावर नेत्यांच्या प्रभावात येऊन निरीक्षक 'सेट' होऊ नये म्हणून त्यांच्यावरही दिल्लीतून 'वॉच' ठेवला जाईल. यासाठी एका गुप्त व्यक्तीची नेमणूक केली जाईल. त्यांची नावे जाहीर केले जाणार नाही. तेदेखील माहिती घेतात, निरीक्षक व गुप्त व्यक्तीचा अहवाल मॅच होतो का हे देखील पाहिले जाणार आहे.
Web Summary : Maharashtra Congress will revamp city and district leadership. Applicants must apply. Observers will gather opinions, create panels for appointments. Delhi monitors observers.
Web Summary : महाराष्ट्र कांग्रेस शहर और जिला नेतृत्व को बदलेगी। आवेदकों को आवेदन करना होगा। पर्यवेक्षक राय एकत्र करेंगे, नियुक्तियों के लिए पैनल बनाएंगे। दिल्ली पर्यवेक्षकों पर नजर रखेगी।