नागपुरातील ‘एसबीएल’ स्फोटातील मृतकांच्या वारसांना ८२ लाखांची नुकसान भरपाई जाहीर
By योगेश पांडे | Updated: March 2, 2026 15:08 IST2026-03-02T15:07:21+5:302026-03-02T15:08:05+5:30
महसूलमंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक : तर ‘पेसो’, ‘डिश’ व कामगार आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार, जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश

Compensation of Rs 82 lakhs announced for the heirs of those killed in the ‘SBL’ blast in Nagpur
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल तालुक्यातील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’ या कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटातील मृतकांच्या वारसांना एकूण ८२ लाखांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात उच्च पातळीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
रविवारी झालेल्या या स्फोटात १९ कामगार आतापर्यंत मृत्यूमुखी पडले असून २३ जण जखमी आहेत. जखमींपैकी १३ जण गंभीर जखमी असून ते ७० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत. तांच्या वारसांना कंपनी कडून ७५ लाख रुपये, राज्य सरकार कडून ५ लाख तर केंद्र सरकार कडून २ लाख रुपये अशी एकूण ८२ लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. ही घटना कशी झाली याची चौकशी सुरू झाली आहे. परंतु पेसो, ‘डिश’चे (डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीअल सेफ्टी ॲंड हेल्थ)चे अधिकारी आणि कामगार आयुक्त विभागाची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या सर्वांनी गेल्या वर्षभरात करावे तसे काम केले नाही.
विभागीय आयुक्त आणि पोलीस अधीक्षक या विभागांची जबाबदारी निश्चित करून पुढील कारवाईची शिफारस करतील. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. केंद्र सरकारकडेदेखील या संदर्भात अहवाल पाठविण्यात येईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान ही घटना कशामुळे झाली याचा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. हा स्फोट निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात अंतिम अहवाल येईल व त्यात जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई होईल, असेदेखील बावनकुळे यांनी सांगितले. संबंधित अहवाल केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनादेखील पाठविण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार
जोपर्यंत ‘एसबीएल’ कंपनी बंद राहील तोपर्यंत कामगारांना वेतन देण्यात येईल. कंपनी परत सुरू झाल्यानंतर त्यांना कौशल्य विकासाबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. काही कामगारांचे अजिबात प्रशिक्षण झाले नव्हते, असे बावनकुळे यांनी सांगितले.