आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार मार्गदर्शक हरपला; ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजीत मेश्राम यांचे निधन
By आनंद डेकाटे | Updated: March 4, 2026 17:51 IST2026-03-04T17:49:43+5:302026-03-04T17:51:18+5:30
Nagpur : आंबेडकरी चळवळीचे विचारवंत, अभ्यासू भाष्यकार, वैचारिक मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजीत मेश्राम यांचे बुधवारी सकाळी ते ८० वर्षांचे होते.

Commentator and guide of Ambedkar movement lost; Senior journalist Prof. Ranjit Meshram passes away
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंबेडकरी चळवळीचे विचारवंत, अभ्यासू भाष्यकार, वैचारिक मार्गदर्शक आणि ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजीत मेश्राम यांचे बुधवारी सकाळी ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, सामाजिक व राजकीय क्षेत्रासह आंबेडकरी चळवळींत शोककळा पसरली असून वैचारिक पत्रकारितेचा एक सशक्त आणि निर्भीड आवाज कायमचा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रा. मेश्राम हे आंबेडकरी विचारसरणीचे निष्ठावंत अभ्यासक व परखड भाष्यकार म्हणून ओळखले जात. सामाजिक विषमता, संविधानिक मूल्ये आणि बहुजन हक्क या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखन व मार्गदर्शन केले. स्पष्टवक्तेपणा, तत्त्वनिष्ठ भूमिका आणि अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती.
त्यांचे शालेय शिक्षण नागपूर येथील माॅडेल हायस्कूल, बर्डी येथे झाले. काही काळ त्यांनी पाचपावली येथील एस.सी.एस. गर्ल्स हायस्कूलमध्ये अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर पीडब्ल्यूएस महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा बजावली. विद्यार्थ्यांमध्ये ते कडक शिस्तीचे पण प्रेरणादायी शिक्षक म्हणून लोकप्रिय होते.
त्यांच्या पश्चात मुलगा प्रियदर्शन (सध्या ऑस्ट्रेलिया येथे नोकरीवर), विवाहित कन्या जुई आणि पत्नी डॉ. सविता मेश्राम (मनपाच्या माजी आरोग्य अधिकारी) असा परिवार आहे.
१९ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. तेव्हापासून ते बेशुद्धावस्थेत मृत्युशी लढा देत होते. बुधवारी सकाळी ८.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या त्यांचे पार्थिव शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथील मृतदेहगृहात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव इंदोरा बुद्ध विहार (जुने निवासस्थानाजवळ) येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात येईल. सकाळी ८ ते ११ या वेळेत नागरिकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर वैशाली नगर स्मशान घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पत्रकारितेतील दादाच, शोध पत्रकारितेला दिला नवा आयाम
सामाजिक बांधिलकी सर्वोपरी मानत लोकाभिमुख पत्रकारितेला वाहून घेतलेले प्रा. रणजित मेश्राम हे पत्रकारितेतील सर्वप्रिय दादाच होते. त्यांचे वृत्तांत आणि स्पेशल रिपोर्टंनी सत्तर -अंशी च्या दशकात धूम माजविली होती. शोध पत्रकारितेचे नवे युग त्यांच्यामुळे नागपुरात उगवले, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी मूक, उपेक्षित, दलित समाजाच्या व्यथा चव्हाट्यावर मांडल्या. सर्वार्थांने दुर्लक्षित परंतु, अफलातून मानसांना त्यांनी आपल्या लेखनीच्या माध्यमातून पुढे आणले. यातून त्यांनी समाजातील हिरेच शोधून पुढे आणले. अनेक प्रकरणे त्यांनी चव्हाट्यावर आणून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. शासन -प्रशासनात त्यांच्या पत्रकारितेचा धाक होता, तर समाजात प्रचंड आदर होता. अध्यापन करतानाच ते पत्रकारितेत आले. लोकमतला ते अर्धवेळ पत्रकार होते, परंतु, त्यांची कारकीर्द आयुष्यभर पूर्णवेळ पत्रकारिता करून निवृत्त झालेल्या पत्रकारांपेक्षाही अविस्मरणीय आणि लक्षणीय अशीच ठरली, या शब्दात ज्येष्ठ पत्रकार , सामाजिक कार्यकर्ता अनिल वासनिक यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला.