मिरची, कोथिंबीर @100!

By Admin | Updated: October 6, 2014 00:58 IST2014-10-06T00:58:31+5:302014-10-06T00:58:31+5:30

भाजीपाल्याची आवक कमी असल्याने घाऊक बाजारातच भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने किरकोळ विक्रीचेही भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळमध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर प्रतिकिलो

Chilli, Cilantro @ 100! | मिरची, कोथिंबीर @100!

मिरची, कोथिंबीर @100!

आवक कमी : भाज्यांचे भाव गगनाला
नागपूर : भाजीपाल्याची आवक कमी असल्याने घाऊक बाजारातच भाजीपाल्याच्या किमती वाढल्याने किरकोळ विक्रीचेही भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळमध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर प्रतिकिलो १०० रुपयांवर आहेत. सध्या कोथिंबीरने स्वयंपाकघरातून एक्झिट घेतली आहे. अन्य भाज्याही आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट बिघडले आहे.
घटलेली आवक आणि वाढलेली मागणी हे प्रमुख कारण भाववाढीसाठी कारणीभूत आहे. भाज्यांचे नवे उत्पादन सहसा दसऱ्याला येते. पण मध्यंतरी आलेल्या पावसामुळे हे पीक दिवाळीनंतर येईल. पावसाचा फटका हिरवी मिरची, कोथिंबीर, पालक, वांगे पिकाला बसला. बहुतांश भाज्यांकडे गृहिणींनी पाठ फिरविली आहे. दिवाळीपर्यंत महाग भाज्य खरेदी कराव्या लागतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)
बटाटे महाग, कांदे आवाक्यात
पावसाचा फटका बटाट्याला बसला आहे. याशिवाय भाज्या महाग झाल्याने बटाट्याच्या किमती वधारल्या आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर, आग्रा, मेणपुरी, इटावा या जिल्ह्यातील बटाट्याची आवक आहे. सरासरी १५ ते १० ट्रक येत आहेत. कानपूर आणि आगरा येथील बटाट्याचे भाव ९०० ते १००० रुपये मण (४० किलो) अर्थात ठोकमध्ये दर्जानुसार प्रति किलो भाव २५ ते २६ रुपये असून किरकोळमध्ये ३० ते ३२ रुपयात विक्री सुरू आहे. याशिवाय कांद्याचे भाव गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आहेत. कळमन्यात लाल आणि पांढरा कांद्याचे सरासरी १५ ते १८ ट्रक येत आहेत. आवक कमी असली तरीही भाव आटोक्यात आहेत. पांढरे कांदे ७५० ते ८५० रुपये मण (४० किलो) आणि लाल कांद्याचे भाव ५५० ते ६५० रुपये आहेत. यावर्षी केंद्राच्या निर्यातीत धोरणामुळे भाव नियंत्रणात असल्याची माहिती कळमना बाजारातील आलू-कांदे आडतिया असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी दिली.
आवक वाढली, टमाटर स्वस्त
मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भाज्यांचे बहुतांश पीक खराब झाले. त्यामुळे आवक घटली, परंतु टमाटर आवक मोठ्या प्रमाणात असल्याने ठोक बाजारात ४० रुपयांवर गेलेले टमाटरचे भाव सध्या १० रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. किरकोळमध्ये २० रुपये किलो आहे. फुलकोबी आणि पत्ताकोबीचे भावही सध्या उतरले आहेत. नारायणगाव, मगनफल्ली, संगमनेर व नाशिकहून टमाटर येत आहेत. गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, छिंदवाडा व औरंगाबाद येथून फुलकोबी आणि नागपूरलगतच्या परिसरातून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारले मोठ्या प्रमाणात येत आहे. ठोक बाजारात १५० गाड्यांची आवक आहे. किरकोळ विक्रीवर दररोजच्या चढउताराचा परिणाम दिसून येत आहे.
हिरवी मिरची बाहेरून आवक
पावसामुळे हिरवी मिरचीचे पीक खराब झाले असून सध्या आवक वरुड (अमरावती), परतवाडा, नांदेड, नाशिक आणि मध्य प्रदेशातील छिंदवाडा, उमरानाला, रायपूर, जगदलपूर, कर्नाटक राज्यातून सुरू आहे. रविवारी कॉटन मार्केट ठोक बाजारात भाव प्रति किलो ६० ते ७० रुपये होते. याशिवाय कोथिंबीरसुद्धा ७० रुपये विकली गेली. किरकोळमध्ये दोन्ही भाज्यांचे भाव १०० रुपयांवर पोहोचले आहेत. दिवाळीनंतर स्थानिक उत्पादकांकडून आवक सुरू होईल, तेव्हा भाव कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये भाज्यांची आवक वाढण्याचा अंदाज आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत जास्त आवक राहील.

Web Title: Chilli, Cilantro @ 100!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.