‘माफसू’त स्थापन होणार ‘सेंटर फॉर वन हेल्थ’ : बलराम भार्गव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:11 IST2019-03-09T00:09:09+5:302019-03-09T00:11:51+5:30
वर्तमान स्थितीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या झाली आहे. या आजारांचा प्रसार टाळणे व मानव पशुंच्या आरोग्यासोबतच वातावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी ‘वन हेल्थ’ची संकल्पना समोर आली आहे. ‘माफसू’ येथे ‘आयसीएमआर’तर्फे (इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च) ‘सेंटर फॉर वन हेल्थ’ या केंद्राची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा ‘आयसीएमआर’चे महासंचालक व केंद्रीय आरोग्य संसोधन विभागाचे सचिव प्रा.बलराम भार्गव यांनी केली. ‘माफसू’च्या (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज् सायन्सेस युनिव्हर्सिटी) नवव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

दीक्षांत समारंभात बोलताना प्रा.बलराम भार्गव. यावेळी मंचावर हेमंतकुमार पवार, प्रा.आशीष पातुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्तमान स्थितीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या झाली आहे. या आजारांचा प्रसार टाळणे व मानव पशुंच्या आरोग्यासोबतच वातावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी ‘वन हेल्थ’ची संकल्पना समोर आली आहे. ‘माफसू’ येथे ‘आयसीएमआर’तर्फे (इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च) ‘सेंटर फॉर वन हेल्थ’ या केंद्राची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा ‘आयसीएमआर’चे महासंचालक व केंद्रीय आरोग्य संसोधन विभागाचे सचिव प्रा.बलराम भार्गव यांनी केली. ‘माफसू’च्या (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज् सायन्सेस युनिव्हर्सिटी) नवव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ‘माफसू’चे कुलगुरू प्रा.आशिष पातूरकर, कुलसचिव हेमंतकुमार पवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी २०१६-१७ व २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील ९९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात पदवीच्या ६६०, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २६६ तर ५५ आचार्य पदवीधारकांचा समावेश होता. ४९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण व रौप्य पदकांनी सन्मान करण्यात आला.
दरवर्षी सरासरी नवनवीन आजाराचा प्रादुर्भाव व पुन:प्रसार होत असतो. ‘सेंटर फॉर वन हेल्थ’मुळे संसर्गजन्य आजार व त्यामुळे वातवारणात होणारे बदल याचेही निरीक्षण करता येणार आहे. ‘आयसीएमआर’तर्फे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेच्या देखरेखीत ‘माफसू’च्या चार हेक्टर परिसरात देशातील हे केंद्र सुरू होईल, असे प्रा.भार्गव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या विकासासाठी करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. प्रा. आशिष पातूरकर यांनी प्रास्ताविक केले व ‘माफसू’तील संशोधनावर प्रकाश टाकला. हेमंत पवार यांनी आभार मानले.
वातावरणातील ७५ टक्के आजार पशुजन्य
दरवर्षी नवनवीन आजारांचा प्रादुर्भाव होतो. यापैकी ७५ टक्के आजार हे पशुजन्य असतात. १९४० पासून आतापर्यंत ३४० हून अधिक रोगांचा प्रसार झाला आहे. यातील ६० टक्के रोग हे ‘झुनोटिक’ तर ७० टक्के वन्यजीवांमुळे प्रसारित झाले. मानवास बाधित करणाऱ्या १४ ते १५ घातक जीवाणूंपैकी ६१ टक्के हे पशुजन्य आहेत, असेदेखील प्रा.भार्गव यांनी यावेळी सांगितले.
मधुरा विश्वासराव, खुशबू आडे यांना सर्वाधिक सात सुवर्ण
दीक्षांत समारंभादरम्यान २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी मधुरा विश्वासराव हीचा २०१६-१७ या वर्षात अव्वल आल्याबद्दल सर्वाधिक सात सुवर्ण व दोन रौप्य पदकांनी सन्मान करण्यात आला तर २०१७-१८ या वर्षातील यशासाठी नागपूर येथील ‘माफसू’ची विद्यार्थिनी खुशबू आडेचा सात सुवर्ण व दोन रौप्य पदकांनी गौरव करण्यात आला. एकूण पदवीधारकांपैकी ७९९ ‘व्हेटरनरी’, ११६ ‘डेअरी टेक्नॉलॉजी’, तर ७६ विद्यार्थी ‘फिशरीज सायन्स’चे होते.