'पण आता सहन होत नाही...' रॅगिंगच्या अंधारात हरवलेली स्वप्नं !

By राजेश शेगोकार | Updated: March 30, 2026 13:02 IST2026-03-30T13:01:34+5:302026-03-30T13:02:16+5:30

Nagpur : 'रात्री खूप भीती वाटते... सतत दडपण राहते... सिनियर्स काय करायला सांगतील, हेच कळत नाही... खूप सहन केलं, पण आता सहन होत नाही...' असा एखादा फोन वसतिगृहात राहणाऱ्या तुमच्या मुलामुलीने किंवा लहान बहीणभावाने केला अन् फोन कट झाला तर तुमची काय अवस्था होईल?

'But I can't bear it anymore...' Dreams lost in the darkness of ragging! | 'पण आता सहन होत नाही...' रॅगिंगच्या अंधारात हरवलेली स्वप्नं !

'But I can't bear it anymore...' Dreams lost in the darkness of ragging!

नागपूर : 'रात्री खूप भीती वाटते... सतत दडपण राहते... सिनियर्स काय करायला सांगतील, हेच कळत नाही... खूप सहन केलं, पण आता सहन होत नाही...' असा एखादा फोन वसतिगृहात राहणाऱ्या तुमच्या मुलामुलीने किंवा लहान बहीणभावाने केला अन् फोन कट झाला तर तुमची काय अवस्था होईल? आपल्या पाल्यांच्या चिंतेने झोप उडालेले पालक मिळेल त्या साधनाने वेळी अवेळी पाल्याकडे धावत सुटतील. पण, यामधील एखाद्याने असा फोन केलाच नाही अन् आयुष्य संपविले तर... त्यानंतरची असहाय्यता, वेदना आणि आयुष्यभर सलणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार..? एकेकाळी गमतीने चालणारे रॅगिंग कोणाचे मानसिक खच्चीकरण करत असेल तर तो केवळ कायद्याने गुन्हा ठरतोच, पण आई-वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा भावनिक व सामाजिक गुन्हाही ठरतो. हे अधोरखित करण्याचे कारण म्हणजे नागपुरातील अलिकडच्या घटना.

नागपुरात राष्ट्रीय स्तरावरील विधी विद्यापीठ हे कायद्याचे ज्ञान देणारे, न्यायाची जाणीत रुजवणारे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा होती. पण, अल्पावधीतच या ज्ञानमंदिरात घडलेल्या रॅगिंगच्या घटनेने समाजमन हादरले आहे. वरिष्ठ विद्यार्थिनींकडून कनिष्ठ विद्यार्थिनींचा छळ हे केवळ धक्कादायक नाही, तर कायद्याच्या मूलभूत मूल्यांनाच हरताळ फासणारे आहे. कायद्याचे धडे गिरवणारे विद्यार्थीच जेव्हा कायद्याची पायमल्ली करतात, तेव्हा हा विरोधाभास अधिक वेदनादायी ठरतो.

तीन महिन्यांपूर्वी नागपुरातीलच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील घटनाही अशीच. द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी कनिष्ठांचा जवळपास २० दिवस छळ केला, ही बाब उघड झाल्यानंतर प्रशासनाने तीन महिन्यांसाठी वसतिगृहात येण्यास बंदी घालण्याची कारवाई केली खरी, पण त्या काळात पीडित विद्यार्थिनींनी सहन केलेल्या मानसिक यातना कोण मोजणार? मुळात रॅगिंगचे प्रकार हे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच अधिक आहेत. ज्या संस्थामध्ये प्रवेश घेऊन आयुष्याचे स्वप्न पालक व पाल्य मिळून जगतात, यासंस्थामध्ये प्रवेश घेणारे हे बुद्धिमान समजले जातात अशा पृष्ठभूमीवर रॅगिंगमधून आपण कुणाच्या तरी आयुष्याचा खेळ करणारे मानसिक खच्चीकरण करत आहोत याची जाणीव 'बुद्धी'ला होत नाही का?

रॅगिंग हा केवळ शिस्तभंगाचा प्रकार नाही, तर तो मानसिक छळाचा गंभीर गुन्हा आहे. अशा वाढत्या घटनांमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेवर रॅगिंग रोखण्याची जबाबदारी आहे. मात्र, केवळ नियम करून चालणार नाही त्यांची कठोर अंमलबजावणी आणि संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक आहे.

मानसिक आरोग्याचा प्रश्नही येथे तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन, मानसिक स्वास्थ्य आणि मदत घेण्याची सवय लावणे गरजेचे आहे. रॅगिंग ही 'परंपरा' आहे, हा समज मोडून काढून, रॅगिंग म्हणजे 'गुन्हा' ही जाणीव प्रत्येकाच्या मनात रुजवली पाहिजे.

महाराष्ट्रात रॅगिंग प्रतिबंधक कायदा, १९९९ नुसार, दोषी आढळल्यास २ वर्षांपर्यंत कारावास आणि १० हजारांपर्यंत दंडाची तरतूद आहे तरीही अशा घटना घडत असतील, तर प्रश्न केवळ कायद्याचा नाही तर मानसिकतेचा आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना मानसिक आरोग्य, तणाव व्यवस्थापन आणि त्रासाची लक्षणे ओळखण्याबद्दल शिक्षित केले पाहिजे.

घरापासून लांब शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनातील नकारात्मक विचार सांगण्यासाठी विश्वासाचेही कोणी त्यांच्या आसपास नसते. अशा स्थितीत संस्थांनी सुरक्षित आणि भय व तणावमुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. संस्थानी रॅगिंग रोखण्यासाठी हॉस्टेल्समध्ये रात्रीची गस्त, अचानक तपासणी आणि विद्यार्थी समुपदेशन यासारखे उपाय महाविद्यालयांकडून प्रभावीपणे केली पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्यांची तुम्ही रॅगिंग करता, तेही तुमच्यासारखीच स्वप्नं उराशी बाळगून इथे आलेले असतात. आपण गेल्यावर्षी 'भोगलं, म्हणून त्यांनीही भोगावं' ही साखळी कुणीतरी तोडलीच पाहिजे. नाहीतर... एखाद्या दिवशी वसतिगृहातील एक खाट रिकामी दिसेल, पुस्तकं तशीच उघडी राहतील आणि फोन कायमचा शांत होईल... पण त्या शांततेचा 'आक्रोश' मात्र आयुष्यभर तुमच्या बॅचच्या कानात घुमत राहील.

Web Title : रैगिंग के अंधेरे में खोए सपने: 'अब और सहन नहीं होता'

Web Summary : नागपुर के शैक्षणिक संस्थानों में रैगिंग की घटनाओं से मानसिक स्वास्थ्य और संस्थागत जिम्मेदारी पर चिंता बढ़ गई है। रैगिंग विरोधी कानूनों का सख्त प्रवर्तन और सहायक वातावरण बनाना त्रासदियों को रोकने के लिए महत्वपूर्ण है। जागरूकता और सहानुभूति आवश्यक है।

Web Title : Lost Dreams in Ragging's Darkness: 'Can't Take It Anymore'

Web Summary : Ragging incidents in Nagpur's educational institutions raise concerns about mental health and institutional responsibility. Strict enforcement of anti-ragging laws and a focus on creating supportive environments are crucial to prevent tragedies. Awareness and empathy are essential.

टॅग्स :nagpurनागपूर