आईसह मुलाला चिरडले
By Admin | Updated: June 12, 2014 01:23 IST2014-06-12T01:23:05+5:302014-06-12T01:23:05+5:30
बसपाचे ज्येष्ठ नेते व गुजरात राज्याचे प्रभारी सुरेश साखरे यांची पत्नी आणि मुलाला बुधवारी दुपारी एका अनियंत्रित टिप्परने चिरडले. यशोधरानगर रिंगरोडवर घडलेल्या या भीषण अपघातामुळे

आईसह मुलाला चिरडले
यशोधरानगर रिंगरोडवर अपघात : बसपा कार्यकर्त्यांमध्ये शोक
नागपूर : बसपाचे ज्येष्ठ नेते व गुजरात राज्याचे प्रभारी सुरेश साखरे यांची पत्नी आणि मुलाला बुधवारी दुपारी एका अनियंत्रित टिप्परने चिरडले. यशोधरानगर रिंगरोडवर घडलेल्या या भीषण अपघातामुळे बसपा कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला आहे. सुरेश साखरे यांच्या पत्नी वर्षा साखरे (४०) आणि मुलगा शशांक ऊर्फ सन्नी (१२) अशी मृतांची नावे आहेत.
सुरेश साखरे नारी रोडवरील बँक कॉलनीमध्ये भाड्याने राहतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा आणि दोन मुली नेहा (२०) आणि साक्षी (१५) आहेत. साखरे यांचे वडिलोपार्जित घर नागसेनवन येथे आहे. तिथे मोठा भाऊ दिवंगत अशोक साखरे यांचे कुटुंब राहतात. बुधवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास वर्षा साखरे या होंडा अॅक्टिव्हा गाडीने मुलगा शशांकला घेऊन नागसेनवन येथील आपल्या घरी जात होत्या. संघर्षनगर टर्निंग पॉर्इंटजवळ मागून येत असलेल्या टिप्परने (क्र. एचआर./५६/ए/२९३४) अॅक्टिव्हा गाडीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकीवरील आई व मुलगा खाली पडला. टिप्परने दोघांनाही चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
टिप्पर चालकाने काढला पळ
ाटनेनंतर परिसरातील लोक एकत्र आले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली; तसेच टिप्पर चालकास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चालक टिप्पर सोडून पळून गेला. या दरम्यान सीताबर्डी येथे बसपा नेत्यांची बैठक सुरू होती. प्रदेश प्रभारी सुरेश माने मार्गदर्शन करीत होते. या बैठकीत अपघाताची माहिती मिळताच शोक पसरला. बैठक रद्द करीत नेते मेयो रुग्णालयात पोहोचले.
वडिलांचा लाडका
शशांक हा सुरेश साखरे यांचा अतिशय लाडका होता. तो भवन्सच्या आष्टी शाखेत शिकत होता. साखरे हे बुधवारी सकाळीच रेल्वेने गुजरातला निघून गेले होते. जाताना ते मुलासोबत बराच वेळ बोलले. ते अकोल्यापर्यंत पोहोचले असतानाच त्यांना अपघाताची माहिती मिळाली.
सहा महिन्यात दुसरा धक्का
सहा महिन्यांपूर्वीच सुरेश साखरे यांचे मोठे भाऊ अशोक साखरे यांचा मृत्यू झाला. गुजरातचे प्रभारी झाल्यापासून साखरे यांचा सर्वाधिक वेळ गुजरातमध्येच जातो. त्यामुळे कुटुंबाचा व्यवसाय अशोक साखरे हेच सांभाळत होते.
जड वाहनांवर बंदी हवी यशोधरानगर रिंगरोडवर जड वाहनांच्या रूपात साक्षात मृत्यूच धावत असतो. चौकात तैनात असलेले वाहतूक पोलीस निव्वळ बघ्याची भूमिका बजावत असतात. रस्त्यावर जागोजागी खड्डे आणि स्पीड ब्रेकर आहेत. या अपघातामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.(प्रतिनिधी)