एका महिन्यात तीन कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे ‘टार्गेट’ - चंद्रशेखर बावनकुळे
By योगेश पांडे | Updated: August 18, 2023 17:54 IST2023-08-18T17:53:53+5:302023-08-18T17:54:22+5:30
’घर चलो’ मोहीमेची सुरुवात विदर्भातून

एका महिन्यात तीन कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे ‘टार्गेट’ - चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे वातावरणनिर्मितीला सुरुवात झाली असून राज्यव्यापी ‘घर चलो’ मोहीम काढण्यात येणार आहे. या मोहीमेच्या माध्यमातून महिन्याभरात तीन कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे भाजपचे उद्दीष्ट्य आहे. पहिल्या टप्प्यात २८ मतदारसंघात संपर्क करण्यात येईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
२० ऑगस्टपासून या राज्यव्यापी मोहीमेची सुरुवात होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० तर लोकसभा मतदारसंघात ६०० कार्यकर्ते या मोहीमेत सहभागी होणार आहेत. या मोहीमेच्या माध्यमातून ३ कोटी नागरिकांपर्यंत पोहचण्याचे पक्षाचे उद्दिष्ट असून एका महिन्यात हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. घरोघरी जाऊन केंद्र सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली जाईल. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३० ते ५० हजार नागरिकांची पक्षाच्या 'सरल अॅप' मध्ये नोंदणी करून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या कामांची माहिती थेट पोहचविणे, नवमतदारांची नोंदणी करणे ही कामेही या मोहीमेत केली जातील, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.