मधमाशी सप्ताह विशेष; भारतात २०० टक्क्यांनी वाढले मधाचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 07:00 IST2022-06-23T07:00:00+5:302022-06-23T07:00:06+5:30
Nagpur News कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या २०१९-२० च्या अहवालानुसार देशात मधाचे उत्पादन २०० टक्क्यांनी वाढल्याची माहिती आहे.

मधमाशी सप्ताह विशेष; भारतात २०० टक्क्यांनी वाढले मधाचे उत्पादन
निशांत वानखेडे
नागपूर : कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय मधमाशी मंडळाच्या २०१९-२० च्या अहवालानुसार देशात मधाचे उत्पादन २०० टक्क्यांनी वाढल्याची माहिती आहे. ही गाेड बातमी आहे, पण साेबत कडू बातमीही आहे. दरवर्षी मधमाशांची संख्या घटत चालल्याने पुरेसे परागीकरण हाेत नसल्यामुळे फळ, फळभाज्या, तेलबिया, कडधान्य यांचे उत्पादन मात्र घटले आहे.
मागील १२ वर्षांपासून सरकारकडून चालणाऱ्या जनजागृती कार्यक्रमामुळे मधमाशी पालकांची संख्या वाढली आहे. २०१९ मध्ये भारतात ९००० च्यावर मधमाशी पालकांची नाेंदणी झाली असून, मधमाशांच्या ३५ लक्ष वसाहती आहेत. देशात २००५-०६ साली ३५ हजार मेट्रिक टन तर २०१३-१४ साली मधाचे उत्पादन ७६,१५० हजार मेट्रिक टन हाेते, जे २०२०-२१ मध्ये १.२५ मेट्रिक टनाच्यावर पाेहचले आहे. भारताकडून ५० टक्के मधाची निर्यात हाेते व यामध्येही २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आपल्याकडे २०१९ मधील आकडेवारीनुसार, भारतात मधमाशीच्या ३.५ दशलक्ष पेट्या आहेत. भारतातील शेतीचे क्षेत्रफळ बघता परागीकरणासाठी आपल्याकडे साधारण १५० दशलक्ष पेट्यांची गरज आहे. ही स्थिती कृत्रिम मधमाशी पालनाची आहे. मात्र नैसर्गिक मधमाशांची स्थिती भारतासारख्या देशासाठी चिंताजनक आहे. आपल्याकडे मधमाशांच्या जवळपास ७९६ प्रजातींची नोंद झालेली आहे. त्यातील ४० टक्के प्रजाती या एण्डेमिक आहेत. भारतात विक्री हाेणाऱ्या एकूण मधातील ५० टक्के मध हे आग्या माशीच्या (एपिस डाेरसाटा) वसाहतीतून येते. अनेक ठिकाणी आदिवासी समाज या वसाहतीतून मध काढून तो मध विक्री करणाऱ्या कंपन्यांना विकतो. या प्रक्रियेत अनेकदा वसाहतींना उद्ध्वस्त केले जाते. त्यामुळे आग्या माशीचे प्रमाणही घटत चालले आहे.
फळ उत्पादन २३ टक्क्यांनी घटले
एका आकडेवारीनुसार दरवर्षी देशातून १० लक्ष मधमाशांच्या नाहीशा हाेतात. घटणाऱ्या संख्येचा परिणात शेती उत्पादनावर दिसून येतो. आकडेवारीनुसार फळ उत्पादन २३ टक्के, फळभाज्या १२ टक्के, तेलबिया १६ टक्के, कडधान्य ४ टक्के आणि मसाले उत्पादनात ३ टक्के घट वर्तविण्यात आलेली आहे.
आहारातील ७१ टक्के पिकांना मधमाशांचा आधार
एफएओनुसार मनुष्याच्या आहारातील मुख्य अन्नापैकी ७१ पिकांना परागीकरणासाठी मधमाशांची आवश्यकता असते. यामध्ये कांदा, कोबी, फ्लावर, भोपळा, मुळा, कोथिंबीर, गाजर, काकडी, टरबूज, मोडीचे धान्य, सूर्यफूल, तीळ, कराळे, मोहरी, तसेच सफरचंद, संत्री, स्ट्रॉबेरी, लिची, जर्दाळू, लिंबू अशा पिकांचा समावेश आहे. फुलझाडे आणि मधमाशी एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे म्हणतात की, एकाचा विनाश झाला तर दुसऱ्याचे अस्तित्वदेखील नाहीसे होईल.