बँकांनी वेळेवर कर्जपुरवठा करावा : पालकमंत्री बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 21:19 IST2019-06-01T21:17:48+5:302019-06-01T21:19:20+5:30
शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

बँकांनी वेळेवर कर्जपुरवठा करावा : पालकमंत्री बावनकुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी आवश्यकतेनुसार वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावनिहाय कर्ज मेळाव्याचे आयोजन करून शेतकऱ्यांना सहज व सुलभपणे कर्जपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
बचतभवन सभागृहात खरीप हंगामातील कर्जवाटप तसेच कर्जमाफीसंदर्भात विविध राष्ट्रीयकृत व खासगी बँकांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बारापात्रे आदी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी विविध बँकांना ९७९ कोटी ९५ लक्ष रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत केवळ १३ हजार ६९४ खातेदार शेतकऱ्यांना १३४ कोटी ४३ लक्ष रुपयांचे कर्जवाटप केले आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकºयांना शेतीसाठी आवश्यक असलेले बियाणे, खते तसेच शेतीच्या मशागतीसाठी कर्जाची आवश्यकता असल्यामुळे प्रत्येक गावात तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी शाखानिहाय कर्ज मेळावे आयोजित करावेत. या कर्ज मेळाव्यात उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना कर्जपुरवठा होईल, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.
खरीप कर्ज वाटपासाठी मागील वर्षी उद्दिष्टापैकी केवळ ७२४ कोटी रुपये म्हणजेच ६० टक्के कर्जवाटप पूर्ण केले होते. परंतु यावर्षी दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यासाठी बँकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याची सूचना करताना बावनकुळे म्हणाले की, महसूल विभाग व सहकार विभागातर्फे आवश्यक असलेली संपूर्ण मदत बँकांना देण्यात येईल.
शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यात ७० हजार ३५६ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ५२ लक्ष रुपयांचे कर्ज माफ झाले आहे. यामध्ये ५० हजार २९१ शेतकऱ्यांचे ३४१ कोटी ५५ लक्ष रुपयांचे कर्जमाफी, ओटीएस योजनेमध्ये ५ हजार ५५७ शेतकऱ्यांना ६० कोटी ९५ लक्ष रुपये तर इन्सेन्टिव्ह योजनेमध्ये १४ हजार ३०८ शेतकऱ्यांना ३२ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
प्रारंभी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक बारापात्रे यांनी खरीप कर्ज योजनेंतर्गत जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट व विविध बँकांनी कृषी कर्जपुरवठा यासंदर्भात केलेल्या कामांचा आढावा घेतला.
विशेष काऊंटर सुरू करावे
राष्ट्रीयकृत बँकांनी १० हजार ८९२ शेतकऱ्यांना १०८ कोटी ४१ लक्ष रुपयांचे कर्ज दिले आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ हजार ४७२ खातेदारांना २१ कोटी ७५ लाख तर ग्रामीण बँकांनी ३३० खातेदारांना ४ कोटी २९ लक्ष रुपये उपलब्ध करून दिले असून कर्जवाटपाच्या तुलनेत केवळ १३ ते २४ टक्केच काम बँकांनी केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ६ टक्के , बँक ऑफ बडोदा १९ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ३३ टक्के तर बँक ऑफ इंडियातर्फे ३१ टक्के कर्जवाटप पूर्ण झाले आहे. कर्जवाटपाचे उद्दिष्ट सर्वच बँकांनी पूर्ण करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. तसेच बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकºयाला योग्य मार्गदर्शन करून जास्तीत-जास्त कर्जपुरवठा कसा उपलब्ध करून देता येईल, यासाठी बँकांनी विशेष काऊंटर सुरू करावे, असे निर्देशही यावेळी दिले.