लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा / पिपळा (डाकबंगला) : पिपळा (डाकबंगला) ता. सावनेर येथील ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील याच्या हत्या प्रकरणाचा तपास कन्हानचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हिमांशू कुंभलकर याची खापरखेडा (ता. सावनेर) पोलिस ठाण्यातील कोठडीतून कन्हान (ता. पारशिवनी) पोलिस ठाण्यात तातडीने रवानगी करण्यात आली असून, दुसरा आरोपी माजी जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकडे यांचे पती सरपंच विष्णू कोकडे यास खापरखेडा ठाण्यातच ठेवण्यात आले आहे.
या दोन्ही आरोपींना मंगळवारी (दि. १७) पहाटे अटक केल्यानंतर दुपारी सावनेर येथील न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने हिमांशूला शनिवार (दि. २१) पर्यंत आणि विष्णू कोकडेला गुरुवार (दि. १९) पोलिस कोठडी सुनावली होती. दोघेही मंगळवारी खापरखेडा पोलिस ठाण्यातील कोठडीत सोबत होते. बुधवारी हा निर्णय बदलण्यात आला आणि हिमांशूची तातडीने कन्हान ठाण्यातील पोलिस कोठडीत रवानगी केली.
विष्णूचा गुरुवारी पोलिस कोठडी काळ संपणार असल्याने तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड त्याला सावनेरच्या न्यायालयात हजर करतील. पोलिस त्याचा कोठडी वाढून मागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने दोन्ही आरोपींना वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय का घेतला, हे मात्र स्पष्ट झाले नाही.
पोलिस अधीक्षकांनी केली पाहणीपोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी गुरुवारी अतुल पाटील याच्या हत्येच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण घटनाक्रम समजून घेत तपासाच्या दृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानंतर ते खापा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाकी शिवारातील द्वारका वॉटर पार्कची पाहणी करायला निघून गेले. या पार्कमध्ये बाऊंसर व सुरक्षा रक्षकांनी ग्राहकांना जबर मारहाण केली होती. यात दोन महिला बेशुद्ध पडल्या होत्या.
विष्णू-हिमांशू सावनेरला कुणाला भेटले ?हिमांशू व विष्णू शुक्रवारी (दि. १३) सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान नेपाली नामक व्यक्तीच्या पानठेल्यावर भेटले होते. तिथे काही वेळ चर्चा केल्यानंतर दोघेही विष्णूच्या वाहनाने सावनेरच्या दिशेने गेले होते, अशी माहिती हिमांशूने पोलिसांना दिली. या माहितीतील सत्यता पडताळून पाहण्यासाठी पोलिसांनी नेपालीचा बयाण नोंदविला व विष्णूला अटक केली. ते दोघे सावनेर येथे कुणाला भेटायला गेले होते, याचाही शोध घेतला जात आहे.
"माझा मुलगा हा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याने गोरगरिबांची कामे केली. पण आरोपीने त्याच्यावर काटेरी चाकूने ३७ वार केले. माझी पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, घटनेत असलेल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. हीच त्याला श्रद्धांजली राहील."- मंदा पाटील, मृत अतुलच्या आई