'अरुण्यऋषी' चितमपल्ली आणि त्यांची छाया : वडिलांना सांभाळण्यासाठी मुलीने लग्नही केले नाही, पण तीही सोडून गेली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:46 IST2025-06-19T19:44:49+5:302025-06-19T19:46:52+5:30
निसर्गप्रेमातून लेखन, आणि प्रेमातून समर्पण : चितमपल्ली पिता-पुत्रींची विरळ कथा

'Arunya Rishi' Chitampally and his daughter Chhaya: The daughter didn't even get married to take care of her father, but she also left him...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मारुती चितमपल्ली यांच्या सेवानिवृत्तीनंतर पत्नीनेच त्यांचा सांभाळ केला. परंतु त्यांचा आजारपणात मृत्यू झाला. तेव्हा त्यांची एकुलती एक मुलगी छाया हिने त्यांचा सांभाळ केला. वयोवृद्ध वडिलांना सांभाळता यावे म्हणून तिने लग्नही केले नाही. परंतु तारुण्यातच अल्पआजारात तीही सोडून गेली.
अरुण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना छाया ही एकुलती एक मुलगी होती. तिने जर्नालिझम केले होते. वडिलांप्रमाणे तिलाही निसर्गाप्रति प्रेम होते. मारुती चितमपल्ली हे सेवानिवृत्तीनंतर लक्ष्मीनगरातील घरी स्थायिक झाले. येथून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. बहुतांश ग्रंथसंपदा त्यांनी नागपुरातील घरातूनच पूर्ण केली. त्यांची मुलगी छाया हीसुद्धा लिहायची. विशेषतः निसर्गावरच त्यांचे लिखाण अधिक असे. विविध वृत्तपत्रांमधून त्यांचे लेख प्रसिद्ध व्हायचे. निसर्गावरच आधारित त्यांनी एक पुस्तकही लिहिले. मारुती चितमपल्ली यांच्या पत्नीचे आजारपणात निधन झाले. त्यानंतर मुलगी छाया यांनीच चितमपल्ली यांचा सांभाळ केला, त्यांच्या सांभाळ करता यावे म्हणून त्यांनी लग्नही केले नाही. मात्र, अल्पशा आजाराने तारुण्यातच त्यांचाही मृत्यू झाला.
मी त्यांच्या सहवासात समृद्ध झालो
मारुती चितमपल्ली यांच्या जाण्याचे अतीव दुःख आहे. लक्ष्मीनगर येथे ते वास्तव्यास असताना त्यांचा मोठा सहवास मला लाभला. ते फार कुणाशी बोलत नसत. प्रत्येक भेटीत ते जंगलातील अनेक अतर्क्स गोष्टी सांगायचे. आमच्या रामटेक येथील कॅपवर येऊन राहण्याची त्यांची खूप इच्छा होती. पण त्यांच्या प्रकृतीमुळे मी त्यांना नेऊ शकलो नाही. नागपूर सोडून ते सोलापूरला जातानाही त्यांना रामटेकला जाता आले नाही. आज तीच खंत मला जाणवत आहे. पण त्याच्या सहवासात मी खरोखर समृद्ध झालो.
अमोल खंते, निसर्गप्रेमी
"पद्मश्री मारुती चितमपल्ली सोलापूरचे असले तरी त्यांच्या आयुष्याचा सर्वाधिक काळ विदर्भात गेला आहे. वनाधिकारी म्हणून ते नवेगाव-बांध अभयारण्यात आणि मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पात दीर्घकाळ होते. जंगल, जंगलातील गूढ व रहस्यमय जीवन, पशू आणि पक्षी हे त्यांच्या ललितलेखनाचे केंद्र होते. जंगलाकडे पाहण्याचा त्यांना तिसरा डोळा होता आणि अतिसंवेदनशील कान त्यांच्याजवळ होते. म्हणून अत्यंत हळुवार, निसर्गाची घडी न मोडता त्यांनी लिहिलेली पुस्तके मराठीत आगळीवेगळी ठरली. त्यांच्या या लेखनाने मराठी लोकमानस समृद्ध झाले आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली."
- प्रमोद मुनघाटे, सदस्य, म. रा. साहित्य व संस्कृती मंडळ