गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

By योगेश पांडे | Updated: June 14, 2025 10:01 IST2025-06-14T09:59:30+5:302025-06-14T10:01:25+5:30

Ahmedabad Air India Plane Crash: एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाच्या क्रॅशनंतर नेमका हा अपघात का झाला, याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. मात्र, विमानांमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड होणे हा प्रकार भारतात नवीन नाही.

Air India Plane Crash: More than 1400 aircraft failures in three years, number of faults in Air India continues to increase | गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

- योगेश पांडे 
नागपूर - एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाच्या क्रॅशनंतर नेमका हा अपघात का झाला, याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. मात्र, विमानांमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड होणे हा प्रकार भारतात नवीन नाही. तंत्रज्ञान व एआयच्या माध्यमातून असे बिघाड कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२२ पासून देशात ‘एअर इंडिया’च्या विमानांतील ‘फॉल्ट्स’ वाढल्याचे दिसून आले आहे.  

विमान बिघाडासंदर्भात ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२२ ते २०२४ या कालावधित  देशभरात विविध कंपन्यांच्या विमानांमध्ये १ हजार ४२६ ‘फॉल्ट्स’ समोर आले. यात ‘एअर इंडिया’ व ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ या कंपन्यांच्या विमानांत ३१३ फॉल्ट्स आढळले. यात ‘एअर इंडिया’तील २२० व ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’मधील ९३ फॉल्ट्सचा समावेश होता. 

कंपनीनिहाय फॉल्ट्स
कंपनी    २०२२    २०२३    २०२४
इंडिगो    ४७१    ११५    १३०
स्पाइसजेट    १५०    १४३    ३४
एअर इंडिया    ६४    ६२    ९४
ए. इं. एक्स्प्रेस    २३    २३    ४७
विस्तारा    ३    १४    ००
एअर एशिया    ८    १६    ००
अकासा    १    ०    ७
अलायन्स एअर    ३    ६     ११ 

दुरुस्ती प्रक्रियेत नियमावलीचे पालन 
विमानातील उपकरणांमध्ये अनेकदा बिघाड होतो. सुरक्षित  सेवेसाठी कंपन्यांनी दुरुस्तीची कारवाई करणे आवश्यक आहे. ही दुरुस्ती विमान देखभाल नियमावलीच्या प्रक्रिया व नियमावलीनुसारच होणे अपेक्षित असते.  समाधानकारक दुरुस्तीशिवाय विमान परत सेवेत आणता येत नाही. उड्डाण अहवाल पुस्तकात याची नोंद करण्यात येते. 
२०२२ ते २०२४ या काळात बहुतांश  कंपन्यांंच्या विमानांमधील बिघाड कमी झाला.  ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सची संख्या मात्र वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

इंडिगोमध्ये सर्वाधिक फॉल्ट्स; पण नियंत्रणात यश
२०२२ ते २०२४ या कालावधीत ‘इंडिगो’ कंपनीच्या विमानांमध्ये सर्वाधिक ७१७ फॉल्ट्स आले. मात्र, विमानांच्या एकूण उड्डाणांच्या तुलनेत कालांतराने यात नियंत्रण आणण्यात कंपनीला यश आले. २०२२ मध्ये ४७२ वेळा तांत्रिक बिघाड समोर आला होता. २०२३ मध्ये ११५ व २०२४ मध्ये १३० वेळा बिघाड दिसून आला. 

Web Title: Air India Plane Crash: More than 1400 aircraft failures in three years, number of faults in Air India continues to increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.