'ऑपरेशन सिंदूर'नंतर सायबर गुन्हेगार सैराट, हेरगिरीच्या नावाखाली करताहेत 'टार्गेट'
By योगेश पांडे | Updated: June 23, 2025 13:05 IST2025-06-23T13:04:32+5:302025-06-23T13:05:00+5:30
Nagpur : नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला असून देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.

After 'Operation Sindoor', cyber criminals are targeting in the name of espionage
योगेश पांडे
नागपूर : पाकिस्तानविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' पराबविल्यानंतर देशात हेरगिरीची काही प्रकरणे समोर आली. त्याच काळात एलओसी ओलांडून पाकिस्तानात गेलेली नागपुरातील सुनीता नावाच्या एका महिलेची हेरगिरीच्याच आरोपांवरून चौकशी सुरू आहे. मात्र, प्रत्येक संकटात नवीन संधी शोधणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता 'हेरगिरी' हाच धागा पकडून नवीन जाळे विणले आहे. नागरिकांना फोन करून ते पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करतात व स्वतःला एटीएस किंवा जम्मू-काश्मीर पोलिस विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून खंडणी उकळत आहेत. हा प्रकार चिंताजनक असून राज्यासोबतच देशभरातील सायबर सेलच्या एजन्सीज अलर्ट झाल्या आहेत.
नागपुरात सुनीताचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हेरगिरीचा मुद्दा ऐरणीवर आला. तिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली होती. याच्या चौकशीसाठी अगदी एनआयए, जम्मू-काश्मीर पोलिसदेखील समोर आले. या घटनेनंतर सायबर गुन्हेगारदेखील वेगळ्या पद्धतीने सक्रिय झाले. त्यांनी देशातील काही लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. मुंबईतीलच गिरगाव येथील एका वृद्ध महिलेलादेखील असाच फोन गेला. दिल्ली एटीएस तसेच जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचारी असल्याचे भासवून सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तिच्यावर हेरगिरी करण्याचा आरोप लावला. तिला अज्ञात नंबरवरून तीन कॉल आले. कॉल करणाऱ्याने स्वतःला दिल्ली एटीएसमधील अधिकारी प्रेम कुमार गुप्ता" असल्याचे भासवले. पाकिस्तानशी संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी बतावणी त्याने केली. तिने दाव्यांवर विश्वास ठेवावा यासाठी तिच्या फोनवर महिलेसोबतचा त्याचा ओळखपत्राचा फोटोही शेअर केला. काहीही केले नसले तरी पोलिस आपल्याला अडकवतील या भीतीपोटी घाबरलेल्या महिलेने त्याला २२ लाख रुपये वळते केले. हा प्रकार समोर आल्यानंतर सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनादेखील धक्का बसला. देशातील इतर काही शहरांतदेखील अशा प्रकारे नागरिकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला.
तुरुंगवासाची दाखवितात भीती
नागरिकांचा पाकिस्तानसोबत दुरान्वये संबंध नसतानादेखील नागरिक अलगदपणे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. फसवणूक करणारे अगोदर पोलिस अधिकारी असल्याचे बोगस आयकार्ड पाठवितात. त्यानंतर हेरगिरीसाठी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि ५० लाख रुपयांचा दंड लागेल अशी धमकी देतात. त्यामुळे नागरिक घाबरतात. गुन्हेगारांकडून आता एआयचादेखील वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आपली काहीही चूक नसल्याचे नागरिकांना माहीत असताना त्यांनी न घाबरता थेट सायबर सेलकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.