अखेर मृत्यूनंतर १९ वर्षांनी शेतकऱ्याला मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:41 IST2018-01-22T23:40:11+5:302018-01-22T23:41:43+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रथम अपीलवर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी निर्णय आला. न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने लागला असून त्याचा लाभ त्याच्या आठ मुलींना मिळणार आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यात आला आहे.

अखेर मृत्यूनंतर १९ वर्षांनी शेतकऱ्याला मिळाला न्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एका प्रथम अपीलवर शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी निर्णय आला. न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने लागला असून त्याचा लाभ त्याच्या आठ मुलींना मिळणार आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचा मोबदला वाढवून देण्यात आला आहे.
व्यंकटराव देशमुख असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते चिंचोली, जि. यवतमाळ येथील रहिवासी होते. अरुणावती प्रकल्पासाठी त्यांची १४ एकर जमीन संपादित करण्यात आली होती. जमिनीचा समाधानकारक मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी १९९५ मध्ये उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. अपील प्रलंबित असताना त्यांचा ३ आॅगस्ट १९९९ रोजी मृत्यू झाला. त्यानंतर २०१७ मध्ये न्यायालयाने देशमुख यांच्या आठही मुलींना वारसदार म्हणून रेकॉर्डवर घेऊन अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल केले होते. त्यावर गेल्या १८ जानेवारी रोजी न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता अपीलकर्त्यांना एक लाख रुपये हेक्टर मोबदला व व्याजासह अन्य लाभ देण्यात यावेत असा आदेश राज्य शासनाला दिला. अपीलकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रवीण देशमुख यांनी बाजू मांडली.
३८०५ दिवसांचा विलंब क्षमापित
या प्रकरणाची देशमुख यांच्या मुलींना माहिती नव्हती. लग्नानंतर त्या सासरी राहात होत्या. देशमुख यांच्या मृत्यूनंतर एका आदेशाचे पालन न झाल्यामुळे उच्च न्यायालयाने २००७ मध्ये अपील खारीज केले होते. मुलींना २०१७ मध्ये या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून नावे रेकॉर्डवर घेण्याची विनंती केली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ३८०५ दिवसांचा विलंब क्षमापित करून आठही मुलींना रेकॉर्डवर घेतले होते.