नळजोडण्या नियमितीकरणासाठी ८३ अर्ज : चौघांचा पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:39 IST2019-05-21T00:39:01+5:302019-05-21T00:39:50+5:30
नागपूर शहराला दररोज ६५० ते ७०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु यातील ५० टक्केच पाण्याचे बिलींग होते. पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. शहरात ३३ हजारांहून अधिक नळ जोडण्या अवैध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याचा विचार करता अवैध जोडण्या नियमित करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सोमवारी पहिल्याच दिवशी नळ जोडणी नियमित करण्यासाठी ८३ जणांनी अर्ज केले. तर नियमितीकरणाला नकार देणाऱ्या चार जणांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.

नळजोडण्या नियमितीकरणासाठी ८३ अर्ज : चौघांचा पाणीपुरवठा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराला दररोज ६५० ते ७०० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु यातील ५० टक्केच पाण्याचे बिलींग होते. पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी होते. शहरात ३३ हजारांहून अधिक नळ जोडण्या अवैध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याचा विचार करता अवैध जोडण्या नियमित करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सोमवारी पहिल्याच दिवशी नळ जोडणी नियमित करण्यासाठी ८३ जणांनी अर्ज केले. तर नियमितीकरणाला नकार देणाऱ्या चार जणांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला.
पाणीटंचाई व शहरात भविष्यात निर्माण होणारी भीषण टंचाई विचारात घेता १४ मे रोजी महापौर आणि आयुक्तांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीत २० मेपासून शहरातील अवैध नळ जोडण्या नियमित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. याला प्रतिसाद देत ८३ जणांनी नियमितीकरणासाठी शपथपत्रासह अर्ज दाखल केले.
शपथपत्रासोबत आधार कार्ड आवश्यक असेल. याव्यतिरिक्त इलेक्ट्रिक बिल, निवडणूक ओळखपत्र, घर कर पावती यापैकी कुठलाही एक पुरावा द्यावयाचा आहे. नागरिकांनी आपले अनियमित नळ कनेक्शन नियमित करून घ्यावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार व आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.
चार टिल्लू पंप जप्त
नळावर टिल्लू पंप लावल्यामुळे पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याचा विचार करता टिल्लू पंप जप्त करण्याची मोहीम राबविली जात आहे. सोमवारी ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांनी चार टिल्लू पंप जप्त केले.