नागपूर जिल्ह्याला आंतरजातीय विवाहासाठी पाच कोटी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 15:10 IST2018-04-13T15:09:53+5:302018-04-13T15:10:07+5:30
समाजातील जातीभेद दूर व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्याला आंतरजातीय विवाहासाठी पाच कोटी अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजातील जातीभेद दूर व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येत आहे.
यावर्षी नागपूर जिल्ह्याला आंतरजातीय विवाहासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यासाठी अद्यापपर्यंत ८७९ अर्ज प्राप्तही जि.प.च्या समाजकल्याण विभागाकडे प्राप्तही झाले आहे.
समाज कल्याण विभागातर्फे या अनुदानाचे वाटप संबंधित जोडप्यांना दिले जाते. यंदा राज्य शासनाकडून या योजनेसाठी पाच कोटीवर निधी नागपूर जिल्ह्यासाठी प्राप्त झाला आहे.
राज्यात सर्वाधिक निधी नागपूरला मिळाला आहे. या प्रोत्साहनपर अनुदानासाठी सर्वसामान्यांबरोबरच दिव्यांगाचाही समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्य आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना ५० हजार, दिव्यांग व अव्यंग असलेल्या जोडप्यांना ५० हजार व दिव्यांग-दिव्यांग जोडप्यांना २५ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
यावर्षी समाजकल्याण विभागाकडे सर्वसाधारण गटातून तब्बल ८४३, दिव्यांग-अव्यंग २४ तसेच दिव्यांग-दिव्यांग गटातून १२ अर्ज आले आहे. हे सर्व अर्ज मंजूरही करण्यात आले आहे. गेल्यावर्षी समाजकल्याणच्या वतीने ३५० जोडप्यांचा सत्कार करून, त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी योजनेला भरपूर प्रतिसाद मिळाला. लवकरच हे अनुदान वाटपासाठी एका सत्कार समारंभाचे आयोजनही करण्यात येणार आहे.
आंतरजातीय विवाहबद्ध जोडप्यांना मदतच
४मुळात आंतरजातीय विवाहाला अजूनही कुटुंबीयांकडून विरोध होतो. त्यामुळे अनेकवेळा पळून जाऊन असे विवाह होतात. त्यानंतर कुटुंबाची साथ रहात नसल्याने नवविवाहितांना नवीन जीवनाची सुरुवात करताना सरकारकडून मिळणारे हे अनुदान खूप गरजेचे असते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेस पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांनी केले आहे.