३७ वर्षे जुन्या खटल्यामध्ये धवड यांच्यासह १६ आंदोलनकर्ते निर्दोष; पुरावे आढळले नाहीत
By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 16, 2026 19:08 IST2026-03-16T19:07:23+5:302026-03-16T19:08:28+5:30
Nagpur : मुंबईला जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यासाठी ३७ वर्षांपूर्वी आंदोलन केल्यामुळे दाखल झालेल्या खटल्यामध्ये माजी आमदार अशोक शंकरराव धवड यांच्यासह १६ आंदोलनकर्त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

16 protesters including Dhavad acquitted in 37-year-old case; no evidence found
नागपूर : मुंबईला जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यासाठी ३७ वर्षांपूर्वी आंदोलन केल्यामुळे दाखल झालेल्या खटल्यामध्ये माजी आमदार अशोक शंकरराव धवड यांच्यासह १६ आंदोलनकर्त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. न्यायाधीश मोहतेसीम बदर यांनी हा निर्णय दिला. सरकारला आंदोलनकर्त्यांविरोधातील गुन्हे सिद्ध करणारे ठोस पुरावे सादर करता आले नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.
इतर आंदोलनकर्त्यांमध्ये दीपक पटेल, नंदकिशोर पापलवार, कमल गौतम, चंद्रकांत गोहणे, कृपाल तिमाने, संजय शर्मा, संजय तिडके, रमेश पवार, बजरंगसिंग धर्मराज, रामगोविंद खोब्रागडे, राजू पटेल, दिनेश तराळे, अजाबराव ढोक, रवीशंकर राऊत व विनोद आलमडोहकर यांचा समावेश आहे. आंदोलनाच्यावेळी मुंबईला जाणारी विदर्भ एक्सप्रेस नागपूर येथून रात्री १०:३० वाजता सुटत होती. ही वेळ बदलवून सायंकाळी ६:३० वाजता करण्यात यावी, अशी प्रवाशांची मागणी होती. ही गाडी सायंकाळी ६:३० वाजता सुटल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहचता येईल व दिवसभर आवश्यक कामे निपटवल्यानंतर सायंकाळी नागपूरकडे रवाना होता येईल, असे प्रवाशांचे म्हणणे होते. परंतु, या मागणीकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नव्हते. परिणामी, धवड यांनी शहर काँग्रेस सेवादल व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांसह १ मे १९८८ रोजी रात्री १० च्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकावरील पहिल्या फलाटावर धडक देऊन नारेनिदर्शने केली. दरम्यान, त्यांनी विदर्भ एक्सप्रेस थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच, रेल्वे पोलिस उप-अधीक्षक हिम्मतराव देशभ्रतार यांना मारहाण केली, असा आरोप होता. रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३५३, ३३२, ३४१, ५०६ व महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम १३५ अंतर्गत एफआयआर नोंदवला होता व प्रकरणाच्या तपासानंतर ६ जून १९८८ रोजी सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.
१३ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू
हा खटला प्रलंबित असताना १३ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधातील खटला आधीच रद्द करण्यात आला होता. या आंदोलनकर्त्यांमध्ये दिवाकर जोशी, उमेश चौबे, सुभाष मासुरकर, महादेव बोरकर, कृष्णकुमार पांडे, विजय विश्वकर्मा, छबुताई कदम, सुभाष भेंडे, लक्ष्मण बोरकर, मुन्नी खान, मुरलीधर तेलरांधे, राजकुमार मिश्रा व उदीतनारायण मिश्रा यांचा समावेश आहे.