शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

जीवच का संपवला रे भावा?

By किरण अग्रवाल | Updated: November 21, 2021 11:10 IST

Farmer Suicede : निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे.

-  किरण अग्रवाल

संकट अगर समस्यांनी नाउमेद व्हायला होते हे खरे, पण म्हणून त्यापुढे गुडघे टेकायचे नसतात. उलट संकटावर मात करीत यशाचे तोरण बांधून दाखवायचे असते. त्यातच असतो खरा पुरुषार्थ, मात्र प्रत्येकालाच हे जमते असेही नाही. परिस्थितीशरणता म्हणा किंवा हतबलता; त्यातून आशेचा पुसटसा प्रकाश दिसत नाही व भविष्याची वाट अंधारलेली दिसू लागते आणि मग अशा स्थितीत खचलेले मन या सर्व जंजाळातून बाहेर पडायच्या विचाराप्रत येऊन ठेपते. घात होतो तो याच टप्प्यावर. प्रवीणचेही दुर्दैवाने तेच झाले म्हणायचे.

 

मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी गावच्या प्रवीण पोळकट या तिशीतल्या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपविले. आत्महत्येपूर्वी प्रवीणने केलेली एक व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांत प्रसारित झाली असून, त्यात त्याने आपली जी वेदना व्यक्त केली आहे ती संवेदनशील मनाची हळहळ घडवून आणणारीच आहे. कॅन्सरग्रस्त पित्याच्या नावावर असलेल्या तीन एकर शेतीला गहाण ठेवून जे ट्रॅक्टर प्रवीणने घेतले होते ते कर्जाचे हप्ते थकल्याने संबंधित कर्जदार कंपनीने ओढून नेले, त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे प्रवीणने म्हटले आहे. वारंवार होणारी निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे, तेच या दुर्दैवी घटनेतून लक्षात यावे.

 

खरेतर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणात कोरोनाचा फटका बसून गेला आहे. या दुःखातून व धक्क्यातून काहीसे सावरत नाही तोच यंदाही अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणून ठेवले. पूर पाण्याने नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेच, पण ते कितपत पुरे पडणार? बळीराजाप्रमाणेच नोकरी गमावलेल्यांच्या आपल्या व्यथा आहेत. लॉकडाऊनमुळे रोजीरोटी बुडालेले तांडेच्या तांडे अनवाणी पायाने गावाकडे निघालेले आपण बघितले आहेत. अनेकांचा व्यापार बंद झाला, बुडाला. थोडक्यात, अपवाद वगळता सर्वच घटकांना फटका बसला; पण तो सोसून सारे उभे होत आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे, कोरोनानंतरच्या नवीन चलनवलनाचा, जीवनशैलीचा आता आरंभ झाला आहे. संकटातून बाहेर पडून व जगण्याची एक नवी उमेद घेऊन सारे काही सुरळीत होऊ पाहत आहे. अशात कोरोना व त्यातून कोसळलेले दुःख दूर सारून उभे होत असताना पुन्हा परिस्थितीवश आत्महत्या घडून येणार असेल, तर धास्तावलेल्या समाजमनाला उभारी मिळवून द्यावयास समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण कमी पडलो की काय; असा प्रश्न उपस्थित व्हावा. कोरोनापूर्वी अशाच परिस्थितीने जेरीस आणलेल्या विदर्भ व वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या लागोपाठच्या आत्महत्यांनी अवघे राज्य हादरले व कळवळलेही होते. आता कोरोनानंतर पुन्हा कर्जबाजारीपणा, नापिकी व नाउमेदीचे चक्र समोर येणार असेल आणि त्याकडे यंत्रणांकडून असंवेदनशीलपणे बघितले जात असेल तर ते गंभीर ठरावे. प्रवीणच्या आत्महत्येने याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे म्हणायचे.

 

अर्थात, अडचणी कितीही असल्या आणि निराशा दाटून असली तरी प्रवीण तू असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते रे. कर्ज देणाऱ्या संस्थेने ट्रॅक्टर ओढून नेले म्हणून काय झाले, ते सोडवून ट्रॅक्टरच काय; विमान खरेदी करण्याची जिद्द घेऊन या संकटाच्या छाताडावर उभे राहता आले असते. जितेपणी पित्याच्या वाट्याला मरण वाढून स्वतःला संपवणे चुकीचेच होते प्रवीण. अरे, कुटुंबाचा विचार केला असता व जवळच्या मित्रांशी बोलून मन मोकळे केले असते तर मार्ग निघाला असता. आपल्या अकोल्याचेच कवी किशोर बळी यांच्या एका कवितेत म्हटले आहे,

''तुझं जीणं भारी खडतर, हे सगळं सगळं खरं

पण तुझ्या या प्रश्नावर, आत्महत्या नसे उत्तर!!

घाबरण्याने तुझ्या अशा गड्या, पर्वत झाली राई

हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही !!''

मग तू का हिम्मत हारलास रे गड्या? जराशा लढाईस सोडून तू आपला जीवच का संपवला रे भावा?

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या