-मनस्विनी प्रभुणे-नायक
आळंदीवरून पंढरपूरला पायी जाणारी वारी हे एक मोठं आश्चर्यच आहे. सातशे वर्षांचा वारसा लाभलेल्या वारीच्या अंतरंगात वेगवेगळ्या पैलूंचे दर्शन घडतं. एवढय़ा मोठय़ा संख्येने एकत्न येणं, कोणत्याही मूलभूत सुविधांचा बाऊ न करता महिनाभर चालत प्रवास करणं असं उदाहरण जगाच्या पाठीवर कुठेच सापडणार नाही.या सगळ्यात लक्ष वेधून घेतात त्या वारीतल्या स्त्रिया! विठ्ठलाला सखा मानून त्याच्याशी ओव्या-अभंग-गवळणीच्या माध्यमातून हितगूज करणार्या वारकरी आया-बाया!वारीत सहभागी होणा-या या (प्रामुख्याने ग्रामीण) स्त्रिया नेमक्या कोणत्या प्रेरणेने येतात? घरदार - प्रापंचिक जबाबदार्या सोडून महिनाभर विठ्ठलाच्या गजरात दंगून जाणं त्यांना कसं जमतं? एरवी स्वत:साठी थोडाही वेळ काढू न शकणार्या या आयाबाया ऐन पावसाळा तोंडावर असताना कशा काय एवढे दिवस वारी बरोबर जात असतील? - असे अनेक प्रश्न वारी सुरू होताच दरवर्षी मनात यायचे. पण त्यासाठीच्या नेटक्या अभ्यासाची संधी मिळाली नव्हती. काही वर्षांपूर्वी तो योग जुळून आला ख्यातनाम लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी आखलेल्या एक प्रकल्पामुळे ! अरुणाताई तेव्हा भारती विद्यापीठाच्या स्त्नी अभ्यास केंद्राची प्रमुख होती. या केंद्राच्या माध्यमातून तिने अनेक प्रकल्प हाती घेतले होते. तिच्याही मनात अनेक वर्षांपासून हा विषय घोळत होता. काही विषयांना योग्य वेळ यावी लागते तसं झालं आणि इतके दिवस मी नुसतीच काठावरून ज्या विषयाकडे बघत होत, त्या डोहात प्रत्यक्ष उतरायला मिळालं.*** वारीतल्या प्रत्येक दिंडीला एक दिंडी प्रमुख असतो जो त्या दिंडीचा व्यवस्थापकही असतो. त्याच्या दिंडीमध्ये सहभागी होणारी प्रत्येक व्यक्ती दिंडी प्रमुखाला माहीत असते. वारीतील अनेक दिंड्या अशा आहेत ज्याच्या दिंडीप्रमुख महिला आहेत आणि अनेक दिंड्या अशाही आहेत ज्या फक्त महिलांच्या आहेत. ज्या गावात मुक्काम होणार तिथे दिंडीतील सर्वांसाठी राहाण्याची - जेवणाची सोय बघणं, कोणी आजारी असेल तर त्याला औषधपाणी करणं यापासून ते यातील सार्वजण आपापल्या घरी सुरक्षितपणे जाईपर्यंतची जबाबदारी दिंडी प्रमुखावर असते. नाशिकवरून येणा-या दिंडीच्या प्रमुख मुक्ताबाई बेलवलकर आम्हाला भेटल्या तेव्हा त्यांनी वयाची सत्तरी पार केली होती. पण त्यांचा उत्साह एखाद्या तरु ण मुलीला लाजवेल असा होता. वारीने पुणे मुक्काम सोडून सासवडला प्रस्थान केलं होतं. मुक्ताबाईना आम्ही सासवडला गाठलं. सासवडच्या एका शाळेत त्यांच्या दिंडीतील सर्व वारकरी महिलांचा मुक्काम होता. आम्ही तिथे पोहचलो तर मुक्ताबाई तिथे नव्हत्या. चौकशी केली तर कळलं, की त्या शेजारच्याच कोणा दिंडीत गेल्या आहेत. त्या दिंडीत भजन - कीर्तनाच्या नावाखाली सिनेमाच्या गाण्यांवर नाचणं सुरू होतं. लाउड स्पीकरचा प्रचंड मोठा आवाज आणि गोंधळ. मुक्ताबाईंनी कोणाकरवी तरी हा धिंगाणा बंद करण्याचा निरोप पाठवला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी मुक्ताबाईच उठून तरातरा गेल्या आणि ते सगळं बंद करून आल्या. मनातील तळमळ, वातावरण शुद्ध राहिलं पाहिजे याचा असलेला आग्रह आणि त्यांचा दरारा या सर्व गोष्टी त्यांच्या कृतीतून जाणवत होत्या. अमरावती - जालना भागातून पायी चालत आलेल्या काही महिला वारकरींच्या भेटी झाल्या. दुपारची वेळ होती. काहीजणी आराम करत होत्या. काहीजणींच्या गप्पा रंगल्या होत्या. काहीजणी स्वत:च रचलेले ओव्या - अभंग एकमेकींना म्हणून दाखवत होत्या. सारं वातावरण अनुभवण्यासारखं होतं. आपलं घर मागे सोडून आलेल्या महिला आपली दु:खंही मागे सोडून आल्या होत्या. ‘कोणत्याही नातेवाइकाकडे जायचं असेल तर आम्हाला घरातून बाहेर पडणं शक्य होत नाही. पण पंढरीची वारी कितीही अडचणी आल्या तरी व्यवस्थित पार पडते. अनेक गावं बघायला मिळतात. नवनवीन मैत्रिणी जोडल्या जातात आणि यातूनच पुढच्या वर्षी येण्याचं बळ मिळतं’ - असं जालन्यावरून आलेल्या कालिंदाबाई जगदाळेंनी सांगितलं होतं, ते अजून आठवतं.
वारीची शिस्त
वारीमध्ये मुख्य पालखीच्या पुढे सत्तावीस आणि पालखीच्या मागे तीनशेपन्नास दिंड्या असतात. दरवर्षी या दिंड्यांची संख्या वाढणारी आहे. एक दिंडी म्हणलं तर त्यामध्ये एक ते पाच हजार वारकरी असतात. आळंदीमधून पालखी निघते तेव्हाच दीड ते दोन लाख वारकरी सोबत असतात. पालखी जसजशी पुढे जाईल तशा त्यामध्ये त्या त्या गावातील दिंड्या जोडल्या जातात. सर्वात शेवटी पंढरपूरला दहा ते बारा लाख एवढय़ा मोठय़ा संख्येने वारकरी जमलेले असतात. यामध्ये महिलांचं प्रमाण पन्नास टक्के एवढे आहे. - म्हणजे पाच ते सहा लाख महिला या वारीमध्ये सहभागी होत असतात. एवढय़ा मोठय़ा संख्येनं अन्य कोणत्या ठिकाणी महिला कोणत्याही कारणासाठी एकत्न येत असतील का?
(लेखिका सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासक आहेत)
nayakmanaswini21@gmail.com