शिक्षण सुधारायचेय... ‘गोपनीय’ माहिती द्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:32 IST2026-04-12T12:32:21+5:302026-04-12T12:32:39+5:30
Education News: भारतीय शिक्षण पद्धत पूर्वी अध्यापक केंद्रित होती. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी-२०२०) ‘विद्यार्थी केंद्रित’ शिक्षण पद्धतीवर जास्त भर दिला आहे. हे धोरण निश्चित करण्यात ‘विद्यार्थी अभिप्राय सर्वेक्षण’ हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

शिक्षण सुधारायचेय... ‘गोपनीय’ माहिती द्या...
- डॉ. प्रवीण शिनगारे
(माजी वैद्यकीय शिक्षण संचालक)
भारतीय शिक्षण पद्धत पूर्वी अध्यापक केंद्रित होती. आता राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी-२०२०) ‘विद्यार्थी केंद्रित’ शिक्षण पद्धतीवर जास्त भर दिला आहे. हे धोरण निश्चित करण्यात ‘विद्यार्थी अभिप्राय सर्वेक्षण’ हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हे सर्वेक्षण हे दोन प्रकारचे आहे, पाहिले प्रशासकीय व दुसरे शैक्षणिक सर्वेक्षण. प्रशासकीय सर्वेक्षणात पायाभूत सुविधा आहेत का?, अध्यापक संख्या नियमाप्रमाणे आहे का?, उपकरणे पुरेशी आहेत का?, नियम पाळले जातात का?, सुविधा आहेत का? इत्यादी बाबींचा समावेश होतो. या सर्वेक्षणामध्ये शासनाच्या नियमांचे, विद्यापीठ, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते का हे पाहिले जाते.
युक्रेन-रशिया युद्ध, कोरोना, इराण-इस्त्रायल युद्ध या घडामोडींमुळे परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील विद्यार्थी अविकसित (भारताहून मागास) देशांमध्ये एमबीबीएस होण्यासाठी जातात, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. मुंबईतील विद्यार्थ्याने अतिदुर्गम गावात जाऊन उच्चशिक्षण घ्यावे, असाच हा प्रकार आहे. यावर उपाय म्हणून देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या १० वर्षांत ५०० वरून ८२२ पर्यंत वाढवली, तसेच एमबीबीएसच्या जागा ७५ हजारांवरून १ लाख २० हजार झाल्या. परंतु, त्या प्रमाणात पायाभूत सुविधा व अध्यापक मिळाले नाहीत. यावर विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा असंतोष आहे. यावर उपाय म्हणून वैद्यकीय आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर ‘विद्यार्थी अभिप्राय सर्वेक्षण प्रणाली’ सुरू केली.
अभिप्राय सर्वेक्षणाचे फायदे काय?
- सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी भाग घेतल्यास मौल्यवान माहिती प्राप्त होऊ शकते. कोणत्या महाविद्यालयात अध्यापक अपुरे आहेत, वैद्यकीय उपकरणे अपुरी आहेत, रुग्णसंख्या पुरेशी नाही, शस्त्रक्रिया संख्या, रक्त तपासणी संख्या इत्यादी आवश्यक बाबींची कमतरता आहे, याची माहिती संकलित होईल.
- संबंधित वैद्यकीय महाविद्यालयास याबाबत स्पष्टीकरण मागवून सुधारण्याची संधी देण्यात येईल. त्या सुधारणा मुदतीत न केल्यास आपली मान्यता धोक्यात येईल, याची जाणीव संस्थाचालकांना होईल. त्यांनी सुधारणा केल्यावर शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
- या प्रणालीत विद्यार्थ्याचे नाव, गाव, मोबाइल, ई-मेल, पत्ता, रोल नंबर, विद्यापीठ इत्यादी गोष्टी विचारण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी कोणतीही भीती न बाळगता प्रामाणिकपणे आपले मत नोंदवतील. विद्यार्थ्याला फक्त महाविद्यालयाचे नाव व एमबीबीएसच्या कोणत्या वर्षाला शिकत आहे, एवढीच स्वत:बद्दलची माहिती भरावयाची आहे.
सर्वेक्षणाचा गैरवापर कसा होऊ शकतो?
या सर्वेक्षणात विद्यार्थी एका लॅपटॉप, मोबाइल, संगणकाच्या माध्यमातून फक्त एकदाच मूल्यांकन अहवाल सादर करू शकतो. पण त्यास विविध ब्राउझरचे ज्ञान असेल तर तो वेगवेगळ्या ब्राउझरचा वापर करून एकाच उपकरणातून एकापेक्षा जास्त वेळा व विविध उपकरणातून असंख्य वेळा फीडबॅक सादर करू शकतो.
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी याचा वापर करून तज्ज्ञांमार्फत आपल्या महाविद्यालयाचा उत्कृष्ट फीडबॅक भरण्यासाठी एजंट नेमण्यास सुरुवात केली आहे.
एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९० टक्के अभिप्राय (एजंटनी भरलेले) उत्कृष्ट आले व फक्त १० टक्के अभिप्राय (खऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेले) ‘सरासरीपेक्षा कमी’ या सदरात मोडणारे आले तर नॅशनल मेडिकल कमिशन काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट नाही.