महायुतीचा धागा निखळला
By Admin | Updated: June 3, 2014 16:07 IST2014-06-03T12:28:17+5:302014-06-03T16:07:55+5:30
एकला चलो रेची भूमिका सोडून सत्तास्थापनेसाठी सर्वांना एकत्र घेऊन चालणारे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महायुतीचा धागा निखळला आहे.

महायुतीचा धागा निखळला
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ३ - महाराष्ट्राच्या राजकारणात एकला चलो रेची भूमिका सोडून समविचारी पक्षांना एकत्र आणून महायुतीची गाठ बांधणारा नेता म्हणून ओळखले जाणारे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने महायुतीतील धागा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे. दिलेल्या शद्बाला जागणारे नेते म्हणून मुंडेची ख्याती होती व यामुळेच महायुतीत सामील झालेल्या पक्षांनी मुंडेवर नेहमीच विश्वास दाखवला.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेना व भाजपला एकत्र आणून महाराष्ट्रात युतीची सरकार आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २००६ मध्ये महाजन यांच्या निधनानंतर युतीच्या भवितव्याविषयी शंका उपस्थित केली जात होते. नितीन गडकरींचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी सख्य असले तरी उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे फारसे जमत नव्हते. त्यावेळी ही युती अभेद्य ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी समन्वयकाची भूमिका साधली. शिवसेना - भाजपमध्ये तणाव निर्माण झाला की गोपीनाथ मुंडे हे यशस्वीरित्या मध्यस्थी करायचे व युती पुन्हा एकोप्याने नांदायची.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे आव्हान परतवून लावायचे असेल तर केवळ शिवसेना- भाजपला एकत्र येऊन चालणार नाही. यासाठी अन्य पक्षांची साथ मिळणे आवश्यक आहे हे मुंडेंनी ओळखले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, महादेव जानकर या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना मुंडेंनी महायुतीत आणले. महायुतीत आणल्यावर ते निवडून यावेत यासाठी मुंडेंनी अथक मेहनत घेतली.
शिवसेनेने आरपीआय नेते रामदास आठवले यांना महायुतीत सामील करण्यात मोलाची भूमिका बजावली. मात्र आठवलेंच्या राजकीय पूनर्वसनाचा प्रश्न निर्माण होताच शिवसेनेने आठवलेंना राज्यसभेची खासदारकी देण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा युतीचे तारणहार म्हणून समोर आले. मुंडेंनी आठवलेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळवून दिली. विशेष म्हणजे यासाठी मुंडेंनी त्यांचे समर्थक प्रकाश जावडेकर यांना डावलून आठवलेंना राज्यसभेत पाठवले. मुंडेच्या या कृतीमुळे भाजप दिलेला शब्द पाळते असा संदेश महायुतीतील अन्य पक्षांपर्यंत गेला होता. आता मुंडेच्या निधनाने महायुतीचा धागाच निखळला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.