चिंताजनक! विदर्भातील सहा जिल्ह्यांत ११ महिन्यांत ११०० शेतकऱ्यांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 04:44 PM2019-12-18T16:44:02+5:302019-12-18T16:44:30+5:30

पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.

Worrying! 1100 farmers commit suicide in 11 months in six districts of Vidarbha | चिंताजनक! विदर्भातील सहा जिल्ह्यांत ११ महिन्यांत ११०० शेतकऱ्यांची आत्महत्या 

चिंताजनक! विदर्भातील सहा जिल्ह्यांत ११ महिन्यांत ११०० शेतकऱ्यांची आत्महत्या 

Next


ची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला
 
-  गजानन मोहोड


अमरावती - दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, यामुळे वाढलेले सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्यांंच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. जगावं कसं, या विवंचनेमुळे पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या ११ महिन्यांत १०५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

आर्थिक संकटातून शेतकरी बाहेर यावा, यासाठी यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंताळ्यात बहुतांश शेतकरी वंचित राहिले. या कर्जमाफीनंतरही विदर्भातील सहा जिल्ह्यांत साडेतीन हजार शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यंदा जानेवारी महिन्यात ८५, फेब्रुवारी ७८, मार्च ९२, एप्रिल ७८, मे ९८, जून ९५, जुलै १०५, आॅगस्ट ११४, सप्टेंबर १०६ आॅक्टोबर ८६, नोव्हेंबर ९५ व १५ डिसेंबरच्यापर्यंत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे.

१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्या
 सन २००१ पासून या सहा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जाचक निकषामुळे फक्त सात हजार ६६७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ हजार ९५० प्रकरणे अपात्र, तर २९६ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. आतापर्यंत सात हजार ६३२ प्रकरणांत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आलेली आहे.

सन २००५ पासून शासन मदतीत वाढ नाही
कर्जबाजारी, कर्ज वसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास सन २००५ च्या शासनादेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरुप आहे. यामध्ये १४ वर्षांत बदल झालेला नाही. विशेष म्हणजे ज्या कर्जासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व निरंतर वाढत राहते. त्यामुळे मृत शेतकऱ्यांचा वारस बँकेचा थकबाकीदार असल्याने त्याला कर्ज मिळत नाही व अन्य लाभांपासून तो वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

आत्महत्यांचा आलेख वाढताच
सन २००१ मध्ये ५२ शेतकरी आत्महत्या होत्या. सन २००२ मध्ये १०४, सन २००३ मध्ये १४८, सन २००४ मध्ये ४४८, सन २००५ मध्ये ४४५, सन २००६ मध्ये १४४९, सन २००७ मध्ये १२४७, सन २००८ मध्ये ११४८, सन २००९ मध्ये १००५, सन २०१० मध्ये ११७७, सन २०११ मध्ये ९९९, सन २०१२ मध्ये ९५१, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१५ मध्ये १३४८, सन २०१६ मध्ये १२३५, सन २०१७ मध्ये ११७६ व सन २०१८ मध्ये ११६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक आत्महत्या यवतमाळात
यवतमाळ जिल्ह्यात मागील दोन वर्षांनंतर कमी झालेल्या शेतकरी आत्महत्या  यंदा वाढल्या आहेत. किंबहुना यंदा राज्यात सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ झाली. बुलडाणा जिल्ह्यात ११ महिन्यांत २५८, अमरावती  २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्धा जिल्ह्यात ७५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व सलग नापिकीमुळे मृत्यूला कवटाळले आहे.

Web Title: Worrying! 1100 farmers commit suicide in 11 months in six districts of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.