दीपक देशमुखसातारा : महामार्गाच्या जवळपास असणाऱ्या वनक्षेत्रातील प्राण्यांचे जीव धोक्यात असल्याचे खिंडवाडी येथे ८ मार्चला बिबट्याच्या अपघाती मृत्यूनंतर स्पष्ट झाले आहे. महामार्गावर भरधाव वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वनविभागाने यावर संयुक्त मोहीम राबवून तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.सातारा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत महामार्ग ओलांडताना आतापर्यंत पाच बिबट्यांचा बळी गेला आहे. जंगल परिसर आणि नागरी वस्ती यांच्या सीमारेषा जवळ येत असल्याने मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. अनेकदा वन्यप्राणी अन्न तसेच पाण्याच्या शोधात रस्ते ओलांडतात. मात्र महामार्गांवरील वाढता वेग, अपुरी संरचना आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे अशा प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. खिंडवाडी परिसरातही यापूर्वी अनेकदा वन्यप्राण्यांचे अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महामार्गांवर योग्य नियोजन, अंडरपास, ओव्हरपासची व्यवस्था, वेग नियंत्रण, चेतावणी फलक तसेच जनजागृती करण्याची गरज आहे.खिंडवाडी परिसरासह अजिंक्यतारा, गोळीबार मैदान आणि यवतेश्वर या भागांमध्ये अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. या भागातून वनक्षेत्र आणि नागरी वस्तीला जोडणारे मार्ग असल्याने वन्यप्राणी अनेकदा महामार्ग ओलांडताना दिसतात. त्यामुळे वनविभागाच्या जागेवर लोखंडी जाळी उभारणे तसेच वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित मार्ग निर्माण करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
खिंडवाडी परिसर ‘हॉटस्पॉट’ ठरत आहेअजिंक्यतारा, खिंडवाडी, गोळीबार मैदान व यवतेश्वर या परिसरात बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले आहे. या भागातून जाणाऱ्या महामार्गावर वन्यप्राणी वारंवार येत असल्याने येथे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे या भागात लोखंडी जाळीचे ग्रील, वन्यजीवांसाठी अंडरपास तसेच वेग नियंत्रणाचे उपाय तातडीने राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.
नैसर्गिक अधिवास जपण्याची गरजसमाजकंटकांकडून डोंगराळ भागात लावण्यात येणाऱ्या आगीमुळेही वन्य प्राण्यांच्या अधिवासावर परिणाम होत आहे. जंगलातील नैसर्गिक अधिवास बाधित झाल्याने वन्यप्राणी तेथून स्थलांतर करू शकतात. त्यामुळे वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
अपघात टाळण्यासाठी या उपाययोजना आवश्यक१. सूचना फलक व चेतावणी व्यवस्था : ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांची हालचाल जास्त आहे तिथे वाईल्ड लाईफ क्रॉसिंग” किंवा “प्राण्यांचा मार्ग” असे सूचना फलक लावणे.२. रिफ्रेक्टर : रात्री दिसण्यासाठी रिफ्लेक्टर असलेले फलक बसविणे.३. वेगमर्यादा नियंत्रण : जंगल परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर कमी वेगमर्यादा ठेवणे. आवश्यक तेथे गतिरोधक किंवा रंबल स्ट्रीप्स बसविणे.४. वन्यजीव कॉरिडॉर व क्रॉसिंग : प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गावर अंडरपास किंवा ओव्हरपास तयार करणे. त्यामुळे प्राणी सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकतात.५. कुंपण : महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वन्यजीव प्रतिबंधक कुंपण बसवणे. कुंपणामुळे प्राणी थेट रस्त्यावर येत नाहीत आणि ते क्रॉसिंग पॉइंटकडे वळतात.६. प्रकाश व रिफ्लेक्टर : रस्त्याच्या कडेला प्राण्यांना घाबरवणारे रिफ्लेक्टर किंवा लाईट्स बसविणे. वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश परावर्तित होऊन प्राणी रस्त्यापासून दूर राहतात.७. जनजागृती : वाहनचालकांमध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे. जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर सावधपणे वाहन चालविण्याचे आवाहन करणे,८. हॉटस्पॉट ओळखणे : ज्या ठिकाणी अपघात जास्त होतात ते हॉटस्पॉट एरियाज ओळखून तिथे विशेष उपाययोजना करणे.९. तंत्रज्ञानाचा वापर : सेन्सर कॅमेरे किंवा अलर्ट सिस्टीम बसवून प्राणी जवळ आल्यास वाहनचालकांना सूचना देणे.
Web Summary : Wildlife deaths on highways prompt calls for mitigation. Underpasses, fencing, speed limits, and awareness campaigns are crucial to protect animals near roads. Habitat preservation is also essential.
Web Summary : राजमार्गों पर वन्यजीवों की मौत के बाद समाधान की मांग तेज। जानवरों को बचाने के लिए अंडरपास, फेंसिंग, गति सीमा और जागरूकता अभियान महत्वपूर्ण हैं। पर्यावास का संरक्षण भी जरूरी है।