भारतातील कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का? सोशल मीडियावरील चर्चांना CM फडणवीसांचे स्पष्ट शब्दात उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:34 IST2026-01-22T19:31:59+5:302026-01-22T19:34:04+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच महाराष्ट्र आणि देशात चर्चा सुरू झाली. भारतातीलच उद्योगांसोबत दावोसमध्ये जाऊन सरकार का करार करत आहे? हाच प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

भारतातील कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का? सोशल मीडियावरील चर्चांना CM फडणवीसांचे स्पष्ट शब्दात उत्तर
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये अनेक कंपन्यांसोबत गुंतवणूक करार केले. यातील काही कंपन्यांचा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. भारतातीलच कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का होत आहेत? याबद्दल दावोस दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. या चर्चेमागे एक टुलकिट तयार झालेले असल्याचे सांगितले. तसेच दावोसमध्येच करार का केले गेले? याबद्दल सविस्तर भूमिका मांडली.
'सोशल मीडियामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक प्रश्न विचारला जात आहे की, देशातील जे उद्योग आहेत, त्या उद्योगांशी गुंतवणुकीचे करार हे दावोसमध्ये का होत आहेत?', असा प्रश्न 'लोकमत'च्या प्रतिनिधीने विचारला.
'महाराष्ट्राचे यश बघवत नाही, असे काही लोक...'
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. पहिल्यांदा तर माझ्या हे लक्षात आलं की, एक टुलकिट तयार झालेली आहे. जी टुलकीट थेट याठिकाणी एवढ्या करताच तयार केलेली आहे की, ज्यांना महाराष्ट्राचे यश पाहवत नाही. असे काही लोक अशा पद्धतीने मेसेजेस तयार करून पोस्ट करत आहेत. किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की, सगळ्यांचा मेसेज सारखाच. त्यामध्ये काहीच अंतर नाही"
सगळे करार हे एफडीआयचे आहेत -फडणवीस
"या टुलकिटच्या मागे कोण आहे, हे आता मी सांगत नाही. ते मला लक्षात येत आहेत. पण, त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो, पहिल्यांदा तर हे जे काही करार आपण करत आहोत. हे सगळे करार एफडीआयचे करार आहेत. हे देशातील गुंतवणुकीचे करार नाहीत. हे थेट परकीय गुंतवणुकीचे करार आहेत", असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
"साधारणपणे ज्यावेळी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असते. त्यावेळी अशा प्रकारचे एफडीआय करणाऱ्या कंपन्या या सगळ्यांच्या बोर्ड मीटिंग या याच्या आसपास असतात. त्यामुळे त्यांची इच्छा असते की, याठिकाणी अशा प्रकारचा करार झाला पाहिजे", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
दावोसमुळे महाराष्ट्राला एक स्थान मिळते -फडणवीस
"दुसरे म्हणजे एक प्रश्न असा देखील विचारू शकतो की, आपण वेगवेगळी राज्य गुंतवणूक परिषदा घेतात. मग त्या परिषदा घेण्याची गरज काय आहे? सगळ्यांना आपल्या कार्यालयात बोलावूनही आपल्याला करार करता यतो. पण, दावोस अशी जागा आहे, तेव्हा त्याची चर्चा फक्त महाराष्ट्रापुरती राहत नाही. तर ती संपूर्ण जगात आणि देशात जातो आणि त्यामुळे महाराष्ट्राला एक स्थान मिळते", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात करार करण्यामागील कारण विशद करताना सांगितले.