शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:10 IST2025-06-15T17:03:32+5:302025-06-15T17:10:26+5:30

पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी दूरदृष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. कुणापासून नुकसान आहे, कुणापासून फायदा आहे हे पाहायला हवे असं गोगावले यांनी म्हटलं.

Who was responsible for the Shiv Sena split?; Minister Bharat Gogavale sensational claim on Rashmi Thackeray | शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा

शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाची जी पद्धत होती तशी उद्धव ठाकरेंची नव्हती. बाळासाहेब आपुलकीने वागवत होते. मात्र त्यांच्यानंतर जो काही कारभार सुरू झाला तो आम्हाला पटला नाही. महिलांनी किती हस्तक्षेप करायचा याला मर्यादा असतात. जर आघाडीवेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर फार वेगळे चित्र असते. त्यात आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिले हे कुठल्याच शिवसैनिकाला पटले नाही. एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देऊ शकले असते परंतु त्यांनी प्रतापराव जाधवांना ते पद दिले. याला मोठेपणा म्हणतात. शिवसेनेत असताना ज्या काही घडामोडी घडत होत्या, त्यात वहिनी आणि त्यांच्या नातेवाईकांचा हस्तक्षेप असायचा. त्यात बऱ्याचदा इच्छा असतानाही उद्धव ठाकरेंना निर्णय घेता येत नव्हते असा खळबळजनक दावा मंत्री भरत गोगावले यांनी करत शिवसेना फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात असल्याचं थेट बोलले आहेत. 

मंत्री भरत गोगावले म्हणाले की, त्या काळात जो काही प्रकार सुरू होता त्यावर आमचा आक्षेप होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव करून आम्ही ही भूमिका घेतली. पडद्यामागे वहिनींचा हस्तक्षेप बराच होता. उद्धव ठाकरेंच्या मनात काही गोष्टी असायच्या त्यात बदल व्हायचे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत नव्हत्या. वर्षावरून आम्हाला माघारी परतावं लागायचे. शिवसेना फुटीची अनेक कारणे आहेत. नेतृत्वाने सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते. कानात चुकीचे सांगणाऱ्यांना जवळ केल्याने हे प्रकार घडतात. संघटनेसाठी प्रामाणिक काम करणाऱ्याला फाट्यावर मारले तर हे घडते असं त्यांनी म्हटलं.

तसेच जेव्हा आम्ही मातोश्रीवर चर्चेला जायचो तेव्हा एकदा चर्चेवेळी नारायण राणे पुन्हा येत असतील तर त्यांना घ्यावे असं मत ठरले होते. राणेंच्या मित्रांसोबत काही चर्चा सुरू होत्या. राणेंचे कोकणात वलय होते. त्यांना मानणारा वर्ग आहे. परंतु कुठे माशी शिंकली माहिती नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे आजारी असताना राज ठाकरे स्वत: हॉस्पिटलला गेले, तिथून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना आणले. त्यावेळी दोन्ही भाऊ एकत्र यावेत असे आम्हाला वाटत होते. तेव्हाही त्या दोघांचे जुळून दिले नाही. त्या ज्या काही खटाटोपी सुरु होत्या त्यातून बाळासाहेबांची शिवसेना राहावी म्हणून आम्ही शिंदेंसोबत एकत्र आलो. आम्ही पक्ष सोडला नाही. दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही धनुष्यबाण, शिवसेना नाव घेऊनच महाराष्ट्रात फिरतोय असंही मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी दूरदृष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. कुणापासून नुकसान आहे, कुणापासून फायदा आहे हे पाहायला हवे. नारायण राणे, छगन भुजबळ हे परत येत होते तेव्हा घ्यायला हवे होते.  राजकारणात कधी कुठे वळण घेईल सांगता येत नाही. कधी जिंकणारा संघही हरतो आणि हरणारा संघही जिंकतो. हिंदुत्व सोडायचे नाही हे बाळासाहेबांनी सांगितले होते. आमचा भरवसा एकनाथ शिंदेंवर ठेवला आहे. पक्षाच्या हितासाठी ते जे काही ठरवतील त्यासोबत आम्ही आहोत असं गोगावले यांनी सांगत ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाष्य केले. 

Web Title: Who was responsible for the Shiv Sena split?; Minister Bharat Gogavale sensational claim on Rashmi Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.