हेमंत करकरेंना कुणी मारलं? किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 18:29 IST2022-05-24T18:28:42+5:302022-05-24T18:29:37+5:30
Kirit Somaiya News: २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना वीरमरण आले होते. दरम्यान, आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हेमंत करकरेंच्या मृत्यूवरून गंभीर आरोप केले आहेत.

हेमंत करकरेंना कुणी मारलं? किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेत केले गंभीर आरोप
पुणे - २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना वीरमरण आले होते. दरम्यान, आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हेमंत करकरेंच्या मृत्यूवरून गंभीर आरोप केले आहेत. हेमंत करकरेंची हत्या कुणी केली? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध असलेल्या व्यावसायिकांचे हेमंत करकरे यांच्या हत्येशी संबंधित लोकांसी संबंध असल्याचा सनसनाटी आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मी जबाबदारीपूर्वक जाणीवपूर्वक सांगतो की, नवाब मलिक यांचे संबंध दाऊदच्या टोळीपर्यंट पोहोचू शकतात. तर उद्धव ठाकरे यांच्या पार्टनरचे संबंध हे कसाबपर्यंत आहेत. कसाबचे कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवारासोबत व्यावसायिक संबंध असलेल्या लोकांचे संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यांशी आहेत, असा दावा सोमय्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, हेमंत करकरेंची हत्या दोन कारणांमुळे झाली. ही हत्या कसाबच्या सहकाऱ्यांनी, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केली. मात्र करकरेंचा मृत्यू हा नकली बुलेटप्रुफ जॅकेटमुळे झाला. या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा हा बिमल अग्रवाल याने केला होता. त्याची चौकशीही झाली होती. त्यानंतर बिमल अग्रवालला अटकही झाली होती. तसेच ज्या बिमल अग्रवालचं नाव या प्रकऱणात पुढे आलं होतं, त्याचं नाव यशवंत जाधव यांच्या घरावर धाडी टाकल्या तेव्हा पुढे आलं होतं, असेही सोमय्या म्हणाले.
दरम्यान, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी कामा हॉस्पिलटच्या आवारात कसाब आणि इतर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हेमंत करकरे यांना हौतात्म्य आले होते.