शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१०० टक्के राजकारणाचं सूत्र मांडणाऱ्या शिवसेनेला आदित्य कुठं घेऊन जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 14:03 IST

सन २०१२ मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं. त्याचवर्षीच्या दसरा मेळाव्यात त्यांनी उद्धव यांच्यासोबत आदित्य यांनाही सांभाळून घेण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं होतं...

- सुकृत करंदीकर- 

वर्षभरापूर्वीची घटना आहे. शिवसेनेचा कार्यक्रम होता. त्यात आदित्य ठाकरे यांच्या एकूण वयापेक्षाही जास्तीची राजकीय कारकीर्द असलेल्या एका शिवसेना खासदाराने आदित्य यांचे जाहीरपणे पाय धरले. त्याची खूप चर्चा झाली. अर्थातच शिवसेनेत नसलेल्यांना या गोष्टीचं जास्त अप्रुप वाटलं. शिवसैनिकांना यात फार काही वावगं वाटलं नव्हतं. कारण स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनीच सात वर्षांपूर्वी शिवसैनिकांकडून जणू ही बाब वदवून घेतली होती. उद्धव आणि आदित्यला तुमच्या हवाली करतोय, असा आदेश बाळासाहेबांनी शिवसैनिकांना दिला होता.  या एकाच आदेशाने बाळासाहेबांनी शिवसेनेच्या भावी नेतृत्वाचा प्रश्न निकाली काढला होता. ठाकरे घराण्याची तिसरी पिढी शिवसेनेवर राज्य करणार, हे बाळासाहेबांनीच ठरवून दिलेलं सूत्र आहे. याला कोणत्याही वयाच्या आणि राजकीयदृष्ट्या कितीही ताकदवान शिवसैनिकानं आक्षेप घेतला नव्हता. पाठीराख्यांचाच आक्षेप नसल्यावर मग पक्षांतर्गत घराणेशाही असावी की नसावी या प्रश्नाला काही काही अर्थ उरत नसतो. शिवसैनिकांनी आदित्य यांचं नेतृत्त्व कसलीही खळखळ न करता सहजी स्विकारलं आहे. बाळासाहेब, उद्धव यांच्या बरोबरीनं आदित्य यांचं छायाचित्र शिवसेनेच्या नेते-कार्यकर्त्यांकडून आता सर्रास झळकावलं जातं. प्रामुख्यानं भावनेच्या बळावरच ज्या पक्षाची आजवरची वाटचाल झाली त्या पक्षात हा घटनाक्रम अनपेक्षित नाही. 

 बाळासाहेबांनी राजकारणाला गजकर्णाची उपमा दिली होती. सन १९९६ मध्ये त्यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण, हे शिवसेनेचं सूत्र असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाकरे घराण्यातला कोणीच, कधीही निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी सांगून टाकलं होतं. यामागचं कारण त्यांनी कधी स्पष्ट केलं नाही. वास्तविक बाळासाहेब, उद्धव किंवा शिवसेनेतून बाजूला झालेल्या राज ठाकरे यांनी आजवर एखादी निवडणूक लढवायचं ठरवलं असतं तर विजय मिळवणं त्यांना जड गेलं असतं अशातला भाग नाही. मुंबई, ठाणे, कोकणातल्या एखाद्या सुरक्षित मतदारसंघातून शिवसैनिकांनी जीवाचं पाणी करुन त्यांची विजयी पताका फडकवली असती. तरी तसं घडलं नाही. ठाकरे घराण्याची ही परंपरा मोडणारं पाऊल आदित्य यांनी मोडलं.

शिवसेनेत नेता हे पद महत्त्वाचं असतं. चार-पाच वर्षांपुर्वी युवा सेनेच्या अधिवेशनात बोलताना आदित्य यांनी बाळासाहेबांचं सूत्र बदलण्याची भाषा केली होती. बाळासाहेबांनी ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण सांगितलं. हे टक्के मी वाढवतोय. शिवसैनिकांनी १०० टक्के राजकारण करावं. १०० टक्के राजकारण केल्याशिवाय १०० टक्के समाजकारण करता येणार नाही, असं आदित्य म्हणाले होते. त्यांचं विधान चमकदार होत. विशेष म्हणजे त्यांना अपेक्षित असलेल्या शंभर टक्के राजकारणाची सुरुवात आदित्य स्वत:पासून करणार आहेत. थेट कृती करुन.

राजकीय घराणेशाहीवर बाळासाहेब यथेच्छ तुटून पडत. शिवसेनेतल्या घराणेशाहीबद्दल मात्र त्यांनी नेहमीच नरमाईची भूमिका घेतली. सन २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं. त्याचवर्षीच्या दसरा मेळाव्यात त्यांनी उद्धव यांच्यासोबत आदित्य यांनाही सांभाळून घेण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलं होतं. त्याच शिवाजी पार्कात १९ जून १९६६ ला शिवसेनेची स्थापना होत असताना प्रबोधनकार ठाकरे यांनीही माझा बाळ महाराष्ट्राला देतोय, असे म्हटले होते. त्याच शिवाजी पार्कात २०१२ मध्ये बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातला अखेरचा दसरा मेळावा घेतला.मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरुन जा. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडं नाही. उद्धव, आदित्यला मी लादलेलं नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढंही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या, असं भावनिक आवाहन बाळासाहेबांनी केलं होतं. त्यावेळी २२ वर्षांचे असणारे आदित्य युवा सेनेचे अध्यक्ष होते आणि अठ्ठाविसाव्या वर्षी तर ते शिवसेना नेते बनले. काडीचाही संघर्ष न करता केवळ ठाकरे घराण्याच्या पुण्याईमुळं हे नेतेपद त्यांच्याकडं चालून आलं आहे. मुंबईच्या सेंट झेविअर्स शाळा आणि के. सी. कॉलेजातून शिक्षण झालेला, कायद्याची पदवी घेतलेला हा तरुण पक्का मुंबईकर आहे. मराठी-हिंदुत्व-वडापाव-नोकरी या भोवती घुटमळणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकाच्या तुलनेत आदित्य अधिक कॉस्मोपॉलिटीन आहेत. ठाकरे घराण्याला लाभलेलं कलेचं वरदान आदित्य यांच्याकडंही आहे. बाळासाहेबांच्या हयातीत २००७ मध्ये त्यांच्या 'माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक' या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं होतं. तेव्हा ते सोळा वर्षांचे होते. ' उम्मीद' हा आठ गाण्यांचा अल्बमही पुढं प्रसिद्ध झाला. त्यावेळी आदित्य यांची पावले राजकारणाकडं वळतील, अशी चर्चा नव्हती. उद्धवसुद्धा कधीकाळी फोटो काढायचे, तेव्हा त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाचीही चर्चा होत नसे. राज ठाकरे, हेच बाळासाहेबांचे राजकीय वारसदार असं बहुतांश शिवसैनिकांना वाटत होतं. पण पुढं बाळासाहेबांनी महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव यांचा शिवसेनेतला राज्याभिषेक केला. यातून निर्माण झालेली भाऊबंदकी महाराष्ट्रानं पाहिली. त्या तुलनेत आदित्य यांच्या राजकारणातला प्रवेश अधिक नियोजन पद्धतीनं आणि विनाअडथळा झाला. आदित्य यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र आघाडी उभारली गेली. राज ठाकरे शिवसेनेत असेपर्यंत भारतीय विद्यार्थी सेनेचं नेतृत्त्व त्यांनी सांभाळलं. त्यांनी 'मनसे' काढल्यानंतर शिवसेनेनं विद्यार्थी सेना गुंडाळली. सन २०१० सालच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी 'युवा सेने'ची घोषणा करुन ती नातू आदित्यकडं सोपवली. पद, पक्षाचं पाठबळ, निर्णय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडण्याची वेळ आदित्य त्यांच्यावर आलेली नाही. अत्यंत कमी वयात सगळं विनासायास घडवत आणलं गेलं आहे.

त्या अर्थाने आदित्य यांच्या राजकारणातल्या अधिकृत प्रवेशाला आता नऊ वर्षं पूर्ण झाली. यशासारखं दुसरं काही नसतं. त्यांच्या या अल्प कारकिर्दीत दोन लोकसभा, एक विधानसभा, मुंबई महापालिका, मुंबई विद्यापीठाची निवडणूक, विधान परिषदेची निवडणूक असं मोठं यश शिवसेनेला मिळत गेलं. या प्रत्येक यशात आदित्य यांचा मोठा वाटा असल्याचा शिवसैनिकांचा दावा आहे. पर्यावरण, प्लास्टीक बंदी, मुंबईतलं नाईट लाईफ, रुफ टॉप हॉटेल, व्हॅलेंटाईन, ओपन जीम किंवा राणीच्या बागेतले पेंग्विन, मेट्रो मार्ग आदी विषयांवर भूमिका घेत आदित्य यांनी त्यांचा 'शहरी कल' स्पष्ट केला आहे. याला त्यांच्या मयार्दा म्हणायच्या की लक्ष्य निश्चित करुन चालवलेले प्रयत्न म्हणायचे याची उत्तरं अजून स्पष्ट झालेली नाहीत. मात्र एका बाबतीत मात्र आदित्य यांनी निराशा केली, असं ठामपणे म्हणता येईल. ती म्हणजे जनसंपर्क आणि प्रवास. मुंबई-ठाणे आणि नाशिक-पुणे या चौकोनाच्या पलीकडे त्यांची गाडी सरकताना दिसत नाही. ह्रदय शस्त्रक्रियेनंतर उद्धव यांच्या हालचालींवर मर्यादा आलेल्या आहेत. या स्थितीत महाराष्ट्र उमजून घेण्याची संधी आदित्य यांच्यापुढं आहे. शिवसैनिकांनी नेतृत्त्व स्विकारल्यानंतर जी धडाडी त्यांनी दाखवायला हवी तशी अजून प्रकट झालेली नाही. निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं काढलेल्या यात्रांमधला 'जनसंवाद' घडवून आणलेला होता. त्यातून आदित्य यांची प्रतिमा महाराष्ट्रात ठसली, असं म्हणता येत नाही.     

कोल्हापुर वगळता पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचं स्थान नगण्य आहे. पुण्यासारख्या राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या शहरात, पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची संघटनात्मक अवस्था दयनीय आहे. मुंबई, कोकण, नाशिक, कोकण आणि मराठवाड्यात असं शिवसेनेचं अस्तित्त्व बेटांसारखं विखुरलेलं आहे. शिवसेनेच्या गेल्या ५२ वर्षांच्या इतिहासात दोनदाच या पक्षाला राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचता आलं. सत्ता असताना संघटना वाढवणार नाही तर केव्हा?  आदित्य कधी सेलेब्रिटींच्या गराड्यात दिसतात, कधी मुंबई-नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिसतात.

पण महाराष्ट्र पिंजून काढणारा दौऱ्याचा झंझावात गेल्या नऊ वर्षात दिसलेला नाही. दुष्काळ, शेतकऱ्यांच्या समस्या, पाणी प्रश्न, बेरोजगारी अशा कोणत्याही मुद्यांवर थेट जनतेत जाऊन मिसळण्याची गरज त्यांना वाटलेली नाही.' मातोश्री' वरच्या पक्ष बैठकांमधला वावर, ' मातोश्री'वर भेटीगाठीसाठी आलेल्या मंडळींबरोबरचे फोटो सेशन, ट्वीटरवरचा संवाद एवढ्यातूनच उभ्या महाराष्ट्रात आपण पोहोचू, या गैरसमजात त्यांनी राहण्याचे कारण नाही. बाळासाहेब ठाकरेंनी देखील त्यांच्या उमेदीच्या काळात कित्येकदा मुंबई पायी फिरली आहे. राज्यभर दौरे केले; सत्तरी ओलांडल्यानंतरच त्यांचा कारभार ' मातोश्री' सुरु झाला. आदित्य मात्र वयाच्या तिशीतच स्वत:ला मातोश्री वर बंदिस्त करुन घेत आहेत, की काय अशी शंका घेण्यास वाव आहे. मुंबई-ठाणे-नवी मुंबईच्या वेशीबाहेर त्यांचं पाऊल कधी पडणार, हा प्रश्न आहे.      

आयतं वाढलेलं ताट मिळतं हा जसा घराणेशाहीचा फायदा असतो तसा एक तोटाही असतो. पुवासुर्रींशी सतत होणाºया तुलनेला तोंड द्यावं लागतं. अपेक्षा बाळगल्या जातात ते इतिहासातल्या कर्तुत्वाकडे पाहात. बाळासाहेब ठाकरेंची भाषा, भूमिकांमधला बेधडकपणा, नेते-अभिनेते-उद्योगपती-साहित्यीक आदींचा त्यांचा बहुआयामी गणगोत, राजकारणात कमावलेली जरब यासारख्या अनेक गुणांच्या आधारे उद्धव यांची कारकिर्द जोखली जाते. खास करुन स्वाभिमानाचा मुद्दा सन २०१४ पासून सातत्याने ऐरणीवर आहे. सत्तेत राहायचं आणि सत्ताधारी भागीदारावर रोज उठून टिकाही करायची, याला शिवसेनेचा सत्तालोलुपपणा  म्हटलं गेलं. २०१४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाच्या बाबतीत भाजपनं शिवसेनेला मागं टाकलं आणि युतीमधल्या थोरल्या भावाची जागा आणि मान भाजपनं शिवसेनेकडून हिसकावून घेतला. बाळासाहेब ठाकरे असते तर हे धाडस भाजपनं दाखवलं असतं का आणि तसं दाखवलं असतं तर बाळासाहेबांनी ते सहन केलं असतं का, या प्रश्नाचं उत्तर उद्धव यांना देता आलेलं नाही. उद्धव यांच्यानंतर आदित्य यांच्याकडं शिवसेनेची सूत्रं येणार आहेत. त्यांनाही या प्रश्नाचं उत्तर शोधून ठेवावं लागणार आहे. आदित्य यांच्या वयामुळं शिवसेना वगळता उर्वरीत पक्ष त्यांना अजूनही गांभीर्यानं  घेत नसल्याचं वास्तव आहे. 

समाजाच्या सर्व स्तरात पोहोचण्याचं भलमोठं आव्हान आदित्य यांच्यापुढं आहे. राजकीय सत्ता मिळवण्याचं यशापयश अनेक मुद्द्यांवर अवलंबून असतं. परंतु, महाराष्ट्राच्या राजकारणातलं, समाजकारणातलं प्रभाव केंद्र बनण्याचं ध्येय आदित्य यांना ठेवावं लागेल. त्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे राज्याच्या सत्तेत जेमतेम पाच वर्षंच होते पण त्यांचा प्रभाव आजही शिवसेनेच्या रुपानं जिवंत आहे. बाळासाहेब राष्ट्रीय स्तरावर पोचले, एवढंच काय पाकिस्तानपर्यंत स्वत:ची ओळख त्यांनी पोहोचवली. बाळासाहेबांची 'आरे ला कारे' करणारी शिवसेना मवाळ केल्याचा आरोप अंगावर घेत उद्धव यांनी वाटचाल केली. या ठाकरी परंपरांचं ओझं बाळगून आदित्य यांना पुढं जायचं आहे. तरुणाईची भाषा आणि तिच्या आकांक्षांना-भावनांना हात घालण्याचं कसब बाळासाहेबांना साधलं होतं. त्या शिदोरीवरच उद्धव यांची कारकीर्द पुढे सरकरली. आताची तरुणाई पुर्वपूण्याईला फार भुलत नाही. राष्ट्रीय पातळीवर राहूल गांधींनी याचा अनुभव घेतला आहे. महाराष्ट्राचं राजकीय अवकाश व्यापण्याची स्पर्धा अत्यंत तीव्र होत असताना आदित्य यांना वैयक्तीक आणि शिवसेनेचा प्रभाव वाढवण्याचं शिवधनुष्य पेलायचं आहे. वरळीतली विधानसभा निवडणूक ही तर केवळ सुरुवात आहे.  ------(समाप्त)-----

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण