औरंगाबाद – मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाणीसाठी नागरिक आक्रमक होताना दिसत आहे. कन्नड तालुक्यातील नागद येथील गावकऱ्यांनी पाणी मिळत नसल्याने चक्क ग्रामपंचायत कार्यालय फोडले. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत मध्ये तोडफोड करत कार्यालयातील साहित्य रस्त्यावर फेकेले.
नागदमध्ये सद्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मंगळवारी पाण्याच्या जाब विचारण्यासाठी गावकरी ग्रामपंचायतमध्ये पोहचले असता, त्यांची तक्रार घेण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये कोणतेही पदाधिकारी उपस्थित नसल्याने महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी ग्रामपंचायतमध्ये तोडफोड सुरु केली. एवढच नाही तर गावकऱ्यांनी सर्व साहित्य रस्त्यावर आणून फेकले. त्यामुळे आता ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे जनतेचा उद्रेक होताना दिसत आहे.
मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात येत असलेले टँकर नियमित येत नसल्याचे प्रकार अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. पाणीटंचाईमुळे नागिरकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे जून महिन्यात चांगला पाऊस पडला तर काही प्रमाणत पाणी प्रश्न मिटू शकते. अन्यथा, औरंगाबादसह मराठवाड्यातील परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.