Congress Vijay Wadettiwar News: शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मोठा विरोध असताना याला कॅबिनेट मध्ये मंजुरी मिळाली. या निर्णयाला काही मंत्र्यांनी विरोध केला, पण नुसते विरोध करून काय होणार? मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांना विरोध करायचा आहे, तर सरकारमधून बाहेर पडा. लोकांना दाखवण्यासाठी विरोध करायचा आणि सरकारमध्ये राहायचे हा दिखावा आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईत संसदेच्या तसेच विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी शाही भोजनाचा बेत करण्यात आला होता. या शाही भोजनासाठी प्रत्येक सदस्यासाठी पाच हजार रुपयाच्या थाळीचे जेवण दिले. राज्य एकीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असताना चांदीच्या ताटात जेवणावळी झोडण्याची आवश्यकता होती का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
हा सरकारचा दुटप्पीपणा आहे
एकीकडे राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही, धानाचा बोनस देणार, असे सांगितले, ते पैसे सरकारने दिले नाही. विदर्भातील ५८ टक्के शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळाले नाही, बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. एकीकडे आदिवासी आणि समाजकल्याण विभागाचा योजनांना कात्री लावण्यात येत आहे, अंगणवाडी सेविकांना पगार मिळत नाही, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दिले जात नाही. गरीब, शेतकरी , सामान्य जनतेला त्यांचे हक्काचे पैसे सरकार देत नाही आणि अंदाज समितीच्या बैठकीला येणाऱ्यांसाठी मात्र चांदीच्या ताटात जेवण हे सामान्यांच्या जखमांवर तिखट मीठ चोळणे आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. गरिबांच्या योजनांसाठी पैसे नाही पण इतरांसाठी पैशाची उधळपट्टी करणे हा सरकारचा दुटप्पीपणा आहे, या शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.
दरम्यान, आता हे शक्तीपीठ महामार्गाच्या मागे लागले आहेत. यासाठी २० हजार कोटी मंजूर झाले आहेत. त्यातले किमान १० हजार कोटी बाहेर येतील आणि शक्तीपीठ महामार्गासाठीचे १० हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरले जातील, असा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.