‘बविआ’च्या मतांसाठी मनधरणी; भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 03:41 PM2022-06-16T15:41:04+5:302022-06-16T15:42:50+5:30

विधान परिषदेच्या निवडणुकीत बविआचे हितेंद्र ठाकूर कुणाच्या पारड्यात आपली मते टाकतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

vidhan parishad election 2022 congress ncp and bjp leaders meet hitendra thakur for support | ‘बविआ’च्या मतांसाठी मनधरणी; भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

‘बविआ’च्या मतांसाठी मनधरणी; भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला

Next

वसई: राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही अपक्षांवर मदार असून, छोट्या पक्षांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने सरशी केली असल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, या पराभवाची परतफेड करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनिती आखली जात आहे. त्याच अनुषंगाने बहुजन विकास आघाडीची मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. बविआकडे तीन आमदार असून निर्णायक त्यांची मते ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. 

बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर हितेंद्र ठाकूर यांची भेट घेणार आहेत. यांच्यासह भाजपच्या मनीषा चौधरी आणि राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे पाटील यांनी ठाकूर यांची भेट घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. 

हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मते फुटली नाहीत. तर अपक्ष आणि लहान पक्षांनी कोणाच्या पारड्यात मतदान केले याचे आखाडे अजूनही बांधले जात आहेत. त्यातच विधान परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदानाने पार पाडली जाते. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. विधानसभेतील लहान पक्ष आणि अपक्षांना वळवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरू आहेत. यातच बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी हितेंद्र ठाकूर काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे १२३ संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या ४ जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या उमेदवारासाठी भाजपला १२ मते कमी पडतात. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे १६१ संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तसेच मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.
 

Web Title: vidhan parishad election 2022 congress ncp and bjp leaders meet hitendra thakur for support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.