Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 09:47 IST2025-06-30T09:46:36+5:302025-06-30T09:47:55+5:30
विशेष म्हणजे शिंदे बोलत असतानाच त्यांच्या शेजारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत हसत पुढे जाताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ, सत्ताधारी आमदारांनी हजेरी लावली होती. त्यातच या कार्यक्रमात घडलेल्या एका प्रसंगाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
ही चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील संवादाची...चहापानाच्या कार्यक्रमावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात या दोघांमधील संवाद कैद झाला. त्यावेळी शिंदे यांच्या चेहऱ्यावरील रागही कॅमेऱ्यात टिपला गेला. एकनाथ शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना आता मला काय विचारताय तुम्ही असा संतापून सवाल केला. हे विधान कॅमेऱ्यात रॅकोर्ड झाले. मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणत्या विषयावर होता हे समोर आले नाही. परंतु एकनाथ शिंदे यांचा त्रागा पाहता ते रागावून बावनकुळेंना प्रश्न करत असल्याचे चित्र समोर आले. विशेष म्हणजे शिंदे बोलत असतानाच त्यांच्या शेजारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसत हसत पुढे जाताना दिसतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हिंदी सक्ती मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांची कोंडी?
मागील काही दिवसांपासून राज्यात हिंदी सक्ती यावरून बराच गदारोळ माजला. राज्यात पहिलीच्या वर्गापासून मुलांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याचा हा निर्णय होता. परंतु या निर्णयाला मोठ्या प्रमाणात मराठी भाषा प्रेमी लोकांकडून तीव्र विरोध झाला. या मुद्द्यामुळे महायुती सरकारला लोकांचा आक्रोश सहन करावा लागला. त्यात ज्या विभागाने हा निर्णय घेतला तो शालेय शिक्षण विभाग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आम्ही पुढे जात आहोत असं म्हणणाऱ्या शिंदेसेनेला हिंदी सक्ती वादावर ठाम भूमिका घेता आले नाही. मात्र त्याचवेळी सरकारमध्ये राहून अजित पवारांनी हिंदी सक्तीवर पहिली ते चौथी हिंदी नको, शिकवायची असेल तर पाचवीपासून शिकवा अशी भूमिका मांडली. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणूस या मुद्द्यावर जन्म झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना जी शिंदेकडे असल्याचा दावा केला जातो. त्यांची या मुद्द्यावरून अडचण झाल्याचे दिसून आले.
हिंदी सक्ती GR मागे
दरम्यान, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा हिंदी शिकवण्याच्या मु्द्द्यावरुन राज्यातील वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.