मंत्र्यांच्या कामगिरीचा लोकसभेसाठी वापर; भाजपाची रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 02:09 IST2019-03-24T02:09:25+5:302019-03-24T02:09:45+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून भाजपा राज्यातील आपल्या प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचा उपयोग करून घेत आहे. एकेका मंत्र्याने त्यांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

मंत्र्यांच्या कामगिरीचा लोकसभेसाठी वापर; भाजपाची रणनीती
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून भाजपा राज्यातील आपल्या प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचा उपयोग करून घेत आहे. एकेका मंत्र्याने त्यांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
त्या अंतर्गत ग्रामविकास व महिला- बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी पत्रपरिषद घेऊन दोन्ही विभागाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते पूर्ण करण्यात आले. १६ हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील ३५ हजार घरांची अतिक्रमणे विनाशुल्क नियमित करण्यात आली. इतर नाममात्र शुल्क आकारून नियमित केली जात आहेत. त्यामुळे हजारो लोकांची घरे त्यांच्या हक्काची झाली, असे त्या म्हणाल्या.
सरपंचांची थेट निवडणूक सुरू केल्याने ग्रामीण भागात नेतृत्व उभे झाले. युवकांचा राजकारण, समाजकारणातील सहभाग वाढला. २८ हजार ग्रामपंचायतीत थेट सरपंच झाले, अशी माहिती त्यांनी दिली.
मातोश्री ग्रामपंचायत योजनेंतर्गत हजारो ग्रामपंचायतींना स्वत:ची कार्यालये मिळाली, हजारो महिला बचत गटांना बिनव्याजी कर्ज मिळाले, अंगणवाडी सेविकांचे मानधन तर वाढविलेच; शिवाय ते थेट बँक खात्यात देणे सुरू केले, माझी कन्या भाग्यश्री योजनेने मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाली.
ग्रामीण भागात घरे
प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागात ७ लाख २२ हजार घरे बांधण्यात आली. तसेच मातोश्री ग्रामपंचायत योजनेत ग्रामपंचायतींना कार्यालये मिळाली.