आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:13 IST2025-06-27T12:12:26+5:302025-06-27T12:13:00+5:30
सध्या जे मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर मराठी माणसांना आपल्यामागे कोणीतरी उभे राहील अशी खात्री पटेल असा विश्वास मामा चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केला.

आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
मुंबई - आजच्या घडीला मराठी माणसांसाठी आणि मराठीच्या मुद्द्यावर हे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत हीच चांगली घटना आहे. ही सकारात्मक पाऊले पडत आहेत. देवाच्या कृपेने आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या दृष्टीने हे चांगले आहे. मी मामा म्हणून दोघांनी एकत्र येण्याचे स्वप्न पाहत असतो आणि ते लवकरच पूर्ण होईल याची मला खात्री आहे असं विधान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी केले आहे. हिंदी सक्तीविरोधात मुंबईत निघणाऱ्या मराठी भाषिक मोर्चाला राज आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे. त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेवर राज-उद्धव यांचे मामा चंद्रकांत वैद्य म्हणाले की, आज दोघे भाऊ एक पाऊल पुढे आलेत. भविष्यात एक एक हात पुढे येऊन ते एकत्र येतील असं मला वाटते. त्यांना सल्ला देण्यासाठी आता ते लहान नाहीत. त्यांना सगळ्या गोष्टींची जाण आहे. पुढची पाऊले नक्कीच यशस्वी आणि सकारात्मक असतील अशी तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे. वेळ आणि तारीख यासाठी शुभ संकेत मिळालेत. त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील असं वाटते. राजकारणात काय चित्र बदलेल हे मला सांगता येत नाही. परंतु मराठी माणसांना आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यांना बळ मिळेल. मराठी माणसांची जी हेटाळणी होत आहे त्याला आळा बसेल असं त्यांनी सांगितले.
तसेच सध्या जे मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर मराठी माणसांना आपल्यामागे कोणीतरी उभे राहील अशी खात्री पटेल. मराठी माणसांना बळ मिळेल. मराठी माणसांचे यातून नक्कीच भले होईल. मराठी माणूस म्हणून मी नक्कीच या मोर्चात उतरेन. त्याशिवाय मामा म्हणून दोन्ही भाचे एकत्र पाहून मला खूप आनंद वाटेल. पुढे काय होणार हे जनता ठरवेल परंतु आजच्या घडीला जो मराठी माणसांवर अन्याय होतोय, त्याविरोधात नक्कीच बळ मिळेल असा विश्वास ठाकरे बंधूंचे मामा चंद्रकांत वैद्य यांनी म्हटलं.
५ जुलैला निघणार मोर्चा
राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्याविरोधात मराठी भाषिकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यात राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात कठोर भूमिका घेतली. त्यात उद्धव ठाकरेंनीही राज्य सरकारला इशारा दिला. त्यानंतर आता मराठी मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्रित येण्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित ५ जुलै रोजी निघणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चात सहभागी होणार आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.