टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:16 IST2025-06-06T17:15:05+5:302025-06-06T17:16:33+5:30
वारीच्या ऐतिहासिक व पवित्र परंपरेत आधुनिक युगातील तरुणांना व नव्या पिढीला सहभागी करून घेण्यासाठी 'ai-Dindi' नावाची एक अभिनव संकल्पना साकार झाली आहे.

टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
जसा जून महिना जवळ येतो, तसे आषाढी एकादशीच्या वारीचे वेध लागतात. आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नव्हे, तर ती आत्मिक शुद्धी, साधेपणा आणि त्याग शिकवणारी एक जीवनप्रवृत्ती आहे. पंढरपूरची वारी सर्व धर्म, जाती आणि वयोगटातील लोकांना एकत्र आणणारी, समाधान आणि शांती देणारी परंपरा आहे.
या ऐतिहासिक व पवित्र परंपरेत आधुनिक युगातील तरुणांना व नव्या पिढीला सहभागी करून घेण्यासाठी 'ai-Dindi' नावाची एक अभिनव संकल्पना साकार झाली आहे.
कशासाठी आहे 'ai-Dindi'?
ai-Dindi ही पारंपरिक वारी आणि आधुनिक व्यवस्थापनाचा सुंदर संगम आहे. १८ वर्षांपूर्वी उदयास आलेली ही संकल्पना पूर्वी “आयटी दिंडी” या नावाने ओळखली जात होती. या उपक्रमात सामील होण्याची इच्छा असणाऱ्यांना 'मी गृहिणी आहे, निवृत्त आहे, आयटी क्षेत्रात नाही तरी सहभागी होता येईल का?', असे प्रश्न पडत होते. वारीत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांनी या उपक्रमाच्या व्याप्तीत वाढ करण्याची गरज अधोरेखित केली. एकीकडे 'आयटी दिंडी' सुरूच ठेवून आता 'ai-Dindi' म्हणजेच All Inclusive Dindi असा नवीन टप्पा सुरू करण्यात आला आहे. आळंदी ते पुणे ह्या टप्प्यात पूर्वीप्रमाणेच आयटी दिंडी ह्या नावाने व्यवस्था कार्यरत राहील, पण वारीच्या पुणे ते पंढरपूर ह्या पुढील टप्प्यांसाठी 'एआय दिंडी' असणार आहे.
ai-Dindiचा अर्थ आणि दृष्टीकोन:
'एआय दिंडी' म्हणजेच ऑल इनक्लुसिईव्ह दिंडी अर्थात कोणताही वय, व्यवसाय, भाषा किंवा पार्श्वभूमी असो, प्रत्येकाला सामावून घेणारी ही सेवा असणार आहे.
Artificial Intelligence: व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात केला जाणार आहे.
Adhyatmik Intelligence: नव्या पिढीत अध्यात्मिक जागृती निर्माण करणे हा या मगच उद्देश आहे.
'ai' म्हणजे मराठीत ‘आई’. माऊलीसारखी प्रेमळ, आधार देणारी ताकद. वारीत प्रत्येक जण एकमेकांना 'माऊली' म्हणतो. हाच आपलेपणाचा, एकतेचा आणि भक्तीचा संदेश आहे.
ai-Dindi काय करते?
ai-Dindi ही नफा नसलेली संस्था असून, ती विविध कंपन्यांत कार्यरत असणाऱ्या अथवा व्यावसायिक असणाऱ्या व्यक्तींद्वारा सेवाभावी वृत्तीने चालवली जाते. अधिकाधिक लोकांना वारीमध्ये सहभागी करून घेणे, त्यांना आपल्या संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची ओळख करून देणे आणि वारीसारख्या अद्भुत आध्यात्मिक अनुभवाची सुलभता निर्माण करणे, हा या वारीचा उद्देश आहे.
कोणालाही आपल्या सोयीच्या दिवशी वारीत सहभागी होता यावे, यासाठी विशेष बस व्यवस्था असते. म्हणजे ज्या दिवशी ज्या टप्प्यावर पालखी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला शनिवारी वेळ आहे आणि पालखी जेजुरी ते वाल्हे या टप्प्यात आहे, तर स्वारगेटहून जेजुरीसाठी बसची व्यवस्था असते. त्या टप्प्याची वारी केली की, संध्याकाळी परत पुण्यात आणून सोडलं जातं.
वारीत सहभागी होण्यासाठी अभंग, टाळ-मृदंग, नामजप व भजन शिकवणारी प्रशिक्षण शिबिरे, भजन संध्या आणि वारीतील खेळ पुण्यात घेतले जातात. प्रत्येक टप्प्यासाठी नाममात्र सेवाशुल्क आकारले जाते. ज्यात बस सेवा, पाणी, नाश्ता, जेवण आणि एआय दिंडीची टोपी समाविष्ट असते. सलग काही दिवस वारी करायची असल्यास राहण्याचीही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. पूर्ण वारी (आळंदी ते पंढरपूर) करण्यासाठीदेखील आखणी व मार्गदर्शन केले जाते.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग आणि नामाच्या संगतीत वारीचा 'ai-Dindi' अनुभव घेण्यासाठी www.aidindi.org यावर नोंदणी करू शकता.