मुंबई : तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवण्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आंदोलनाच्या मैदानात उतरले आहेत. ५ जुलैला मनसेचा गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा निघणार आहे, तर उद्धवसेनेने मराठी भाषा केंद्राच्या ७ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देत त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारकाला वंदन करून हा मोर्चा आझाद मैदानात जाणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी राज यांची शिवतीर्थवर भेट घेतली, तर दुसरीकडे, मराठी अभ्यास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीविरोधात स्वतंत्र आंदोलनाची हाक दिली.
भुसे पहिलीपासून हिंदी शिकले का?
शिक्षणमंत्री दादा भुसे नुकतेच भेटून गेले. त्यांची भूमिका पूर्णपणे फेटाळली. ती आम्हाला मान्य नाही. जुन्या शिक्षण पद्धतीमुळेच महाराष्ट्र मोठा झाला असताना अचानक ही भाषा का लादताय? पाचवीनंतर हिंदी शिकूनच भुसे शिक्षणमंत्री झाले ना? त्यांना कोणी पहिलीपासून हिंदी शिकवली का? असा टोला राज यांनी भुसे यांना लगावला.
हिंदी सक्तीच्या माध्यमातून मराठी आणि इतर भाषिकांच्या एकजिनसीपणात विषाचा खडा टाकण्याचा प्रयत्न होत आहे. हिंदी सक्ती राज्यात राबवू देणार नाही. मुख्यमंत्री राज्यात भाषिक आणीबाणी ते राबवित आहेत.
- उद्धव ठाकरे, उद्धवसेनाप्रमुख
देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नको. सरकारनेही पाचवीपर्यंतचा हट्ट सोडावा. - शरद पवार, अध्यक्ष, शरद पवार गट
राज्य शासनाने हिंदी ही तिसरी भाषा शाळेत अनिवार्य केली आहे. मात्र, या भाषेची पहिलीपासून सक्ती योग्य नाही. - सुनील तटकरे (प्रदेशाध्यक्ष, अजित पवार गट)
माझे उद्धवजींना एवढेच सांगणे आहे की मराठी भाषेमध्ये टोमण्यांपेक्षा अधिक चांगले शब्द अलंकार आहेत, ते त्यांनी उपयोगात आणले तर अधिक चांगले होईल. हिंदी सक्तीची नाहीच, मराठी सक्तीची आहे. हिंदी पर्यायी आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
गेल्या काही दशकांत देशात फुटीची बीजे रोवण्यासाठी भाषेचा साधन म्हणून वापर करण्यात आला. हिंदी ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, तर ती भारतीय भाषांची मैत्रीण आहे. - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा त्रिभाषा अहवाल स्वीकारून हिंदी सक्तीचे धोरण उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले. - उदय सामंत, उद्योगमंत्री
सरकारची परीक्षा बघणारे अधिवेशन ३० जूनपासून
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत सुरू होणार असून ते १८ जुलैपर्यंत चालेल. हिंदी भाषेवरून सुरू असलेला वाद, शक्तिपीठ महामार्गाला विरोध, कायदा व सुव्यवस्था या मुद्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. विरोधकांच्या माऱ्याला प्रत्युत्तर देण्याची सरकारची रणनीती असेल. गुरुवारी विधिमंडळ कामकाज समितीची बैठक विधानभवनात होऊन १८ जुलैपर्यंत अधिवेशन चालविण्याचा निर्णय झाला.
हिंदी, शक्तिपीठ महामार्गासह अलीकडे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हा मुद्दाही विरोधक लावून धरतील. महायुती सरकार या अधिवेशनात नक्षलवादाला पायबंद घालण्यासाठीचे जनसुरक्षा विधेयक आणणार असून त्यावरूनही सत्तारुढ आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.